नाशिक : ऐतिहासिक शहर आणि पैठणीचे माहेर घर असलेल्या येवला-लासलगाव मतदारसंघातून सलग तीन टर्म निवडून येणारे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यापुढे यंदा स्वत:च्या पक्षातीलच माणिकराव शिंदे यांनी उमेदवारीसाठी पक्षाकडे दावा केला आहे. त्यामुळे छगन भुजबळांपुढे पक्षातूनच आव्हान उभं राहिलं आहे.


2004 साली येवल्यातील स्थानिक नेत्यांनी छगन भुजबळांना येवल्यातून उमेदवारीसाठी गळ घातली आणि भुजबळांची येवला मतदारसंघात एन्ट्री झाली. आघाडी सरकारच्या काळात छगन भुजबळ राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर स्थानिक नेत्यांच्या मदतीने भुजबळांनी मतदार संघाचा चेहरा-मोहरा बदलून टाकला.


2009 साली भुजबळांसोबत सातत्याने राहणारे माणिकराव शिंदे यांनी भुजबळांची साथ सोडत शिवसेनेचा रस्ता धरला. शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली, मात्र विकास कामांच्या जोरावर भुजबळ पुन्हा एकदा निवडून आले. कालांतराने माणिकराव शिंदे पुन्हा भुजबळांच्या जवळ पोहचले. स्थानिक नेत्यांमध्ये आपआपले वर्चस्व सिद्ध करण्याची चढा-ओढ असल्याने गटा-तटाचे राजकारण वाढू लागले.


2014 च्या निवडणुकीपूर्वी भुजबळांसोबत असलेले माजी आमदार मारुती पवार यांचे पुतणे संभाजी पवार यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आणि भुजबळांविरोधात शिवसेनेकडून निवडणूक लढवली. मात्र यावेळी देखील भुजबळ निवडून आले. मात्र राज्यात शिवसेना-भाजपाची सत्ता आली आणि येवल्यातील विकास कामांना खिळ बसण्यास सुरुवात झाली.


2016 मध्ये भुजबळांचा खऱ्या अर्थाने कसोटीचा काळ सुरु झाला. छगन भुजबळांच्या मागे ईडीचे शुक्लकास्ट सुरु झाले. भुजबळांच्या संपत्तीची चौकशी सुरु झाली. भुजबळांच्या अनुपस्थितीत येवल्यातील त्यांच्या संपर्क कार्यालयातील होणारी गर्दी कमी होऊ लागली. याच वेळी भुजबळांना तुरुंगात जावं लागलं आणि त्यांच्या जवळ असणाऱ्या अनेकांनी शिवसेनेचा रस्ता धरला. भुजबळ तुरुंगात असल्याने मतदार संघावरील त्यांची पकड काही प्रमाणात कमी झाली. नाशिक मनपामध्ये शिवसेना-भाजपची सत्ता आली. हीच परिस्थिती पंचायत समिती आणि झेडपी निवडणुकीत पाहायला मिळाली. तर मतदारसंघातील विकासकामांचा वेगही कमी झाला.


दरम्यान विरोधकांमध्येही उमेदवारसाठी रस्सीखे सुरु झाली. शिवसेनेकडून गेल्यावेळी संभाजी पवार आणि पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती रुपचंद भागवत यांचे उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी रुपचंद भागवत यांनी विविध उपक्रमांचा धडाका लावला आहे. तर भाजपाकडून बाबा डमाळे, आनंद शिंदे यांची नावं चर्चेत आहे.


येवला मतदारसंघात लासलगाव सह निफाड तालुक्यात अनेक गावांचा समावेश आहे. लासलगावमध्ये भुजबळांसोबत असणारे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर हे देखील शिवसेनेत गेले तर ग्रामपंचायतीची सत्ता सध्या त्यांच्याच ताब्यात आहे. त्यामुळे यंदा भुजबळांच्या खेम्यातील बळ मात्र निश्चितच कमी झालं आहे.


छगन भुजबळांची सध्याची जमेची बाजू


येवला तालुका तसा आवर्षणग्रस्त तालुका असल्याने पाणीप्रश्न हा येथील सर्वात मोठा मुद्दा आहे. येवला शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागाला पालखेडमधून मिळणाऱ्या पाण्याच्या आवर्तनावर अवलंबून रहावे लागते. मतदारसंघाचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आघाडी सरकारच्या काळात भुजबळांनी मांजरपाडा धरणाची निर्मिती केली. त्यासाठी मोठा निधी त्यांनी मंजूर करुन घेतला आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली, पुणेगाव-डोंगरगाव पोहच कालवे तयार झाले. मात्र निधीअभावी मांजरपाड्याचे अंतिम टप्प्यातील काम रखडले. तुरुंगात बसून भुजबळांनी मांजरपाड्याच्या अंतिम कामासाठी निधी देण्यात यावा, अशी सरकारला पत्राद्वारे मागणी केली. अंतिम टप्प्यातील काम पूर्ण होऊन नुकतेच त्या पाण्याचे जलपूजन भुजबळांच्या हस्ते करण्यात आले. भुजबळांनी दिलेले आश्वासन पूर्ण केल्याची भावना निश्चितच मतदारसंघातील जनतेत आहे. हीच भुजबळांची सर्वात मोठी जमेची बाजू आहे.


विधानसभा-2014 मतदानाची आकडेवारी


छगन भुजबळ (राष्ट्रवादी) - 1,12,787


संभाजी पवार (शिवसेना) 66,345


पौलस अहिरे (बसपा) - 1101


निवृत्ती अहिरे (कॉंग्रेस) - 875


अभिजीत गायकवाड (अपक्ष) - 575


छगन भुजबळांचा मतदार संघावर असलेला दबदबा लोकसभा निवडणुकीत हवा तसा दिसून आला नाही. मतदारसंघातून भाजप-शिवसेनेच्या डॉ. भारती पवार यांना मिळालेली मते पाहता भुजबळांचं बळ या निमित्ताने दिसून आलं. तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारालाही चांगलं मतदान झालं. त्यामुळे वंचित आघाडीतून एखादा तगडा उमेदवार विधानसभा निवडणुकीत उभा राहिल्यास त्याचा फटका भुजबळांना बसू शकतो.


अशारीतीने विकासाच्या जोरावर पुन्हा एकदा छगन भुजबळनाच पसंती मिळणार असली तरी पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलं आहे. भुजबळांना सोडून गेलेले परत त्यांच्याकडे येतील का? की स्वपक्षातूनच त्यांना आव्हान उभे राहणार? हे येत्या निवडणुकीच्या काळात पाहायला मिळेल.