माढ्यात राजकीय नाट्य, काँग्रेस आमदाराचा भाजप उमेदवाराला पाठिंबा
एबीपी माझा वेब टीम | 10 Apr 2019 10:29 AM (IST)
ज्यांना रणजित निंबाळकर यांना मतदान करावंसं वाटतं, त्यांना हात वर करण्याचं आवाहन करताच सर्वच कार्यकर्त्यांनी टाळ्या आणि शिट्या वाजवत हात वर केले. अशाप्रकारे गोरे यांनी यंदा भाजपच्या रणजित निंबाळकर यांच्या मागे राहण्याचे संकेत दिले.
पंढरपूर : लोकसभा निवडणुका अक्षरशः हाकेच्या अंतरावर असताना नाट्यमय घडामोडींना सुरुवात झाली आहे. माढ्याची निवडणूक तर दिवसेंदिवस अधिकच रंगतदार होत चालली आहे. माण खटावचे काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रणजित निंबाळकर यांना पाठिंबा देण्याचे स्पष्ट संकेत भव्य कार्यकर्ता मेळाव्यात दिले. माण खटाव तालुक्यातील बोराटवाडीमध्ये काँग्रेसचा भव्य कार्यकर्ता संवाद मेळावा रात्री पार पडला. या मेळाव्याला संपूर्ण तालुक्यातून हजारोंच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते हजर होते. 'यावेळी परिस्थिती वेगळी असून आपण काँग्रेसवर जरी नितांत प्रेम करत असलो, तरी आपल्या भागाला पाणी आणण्याच्या कामाची सुरुवात रणजित निंबाळकर यांच्या वडिलांनी केली' असं गोरे म्हणाले. 'ज्यांना राष्ट्रवादीला मतदान करावंसं वाटतं, त्यांनी हात वर करावा' असं आवाहन जयकुमार गोरे यांनी केलं. मात्र कोणीही हात वर न केल्यावर ज्यांना रणजित निंबाळकर यांना मतदान करावंसं वाटतं, त्यांना हात वर करण्याचं आवाहन करताच सर्वच कार्यकर्त्यांनी टाळ्या आणि शिट्या वाजवत हात वर केले. अशाप्रकारे गोरे यांनी यंदा भाजपच्या रणजित निंबाळकर यांच्या मागे राहण्याचे संकेत दिले. गेल्या नगरपालिका निवडणुकीनंतर गोरे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामागे राष्ट्रवादीचा हात असल्याचा आरोप गोरेंच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. जयकुमार गोरेंच्या निर्णयाने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. माढा हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. पवारांनी माढ्यातून निवडणूक लढवण्याचं सूतोवाच सुरुवातीला केलं होतं, मात्र नंतर माघार घेतली. आघाडीची माढ्यात हार झाल्यास तो मोठा पराभव मानला जाईल. VIDEO | माढ्यातील मोहिते पाटलांचं राष्ट्रवादीवर दबावतंत्र? | स्पेशल रिपोर्ट | सोलापूर कोण आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर? - सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष - अडीच महिन्यांपूर्वी जिल्हाध्यक्षपदी निवड - खासदार हिंदुराव नाईक निंबाळकरांचे चिरंजीव - स्वराज उद्योग समुहाची स्थापना - स्वराज्य उद्योग समुहातून युवकांची फौज - 1996 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजप शिवसेनेच्या युतीकडून हिंदुराव नाईक निंबाळकरांना उमेदवारी