मुंबई : भाजप सरकारने राज्यात आणि देशात चांगली कामं केली आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत जनता आमच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. मुनगंटीवार एबीपी माझाच्या 'तोंडी परीक्षा' या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, काँग्रेसचा जाहीरनामा, राज ठाकरे यांच्या प्रचार सभा अशा विविध मुद्द्यांवर विचारलेल्या प्रश्नांना मनसोक्त उत्तरे दिली.


राज्यात अनेक ठिकाणचे शेतकरी कर्जमाफीचा फायदा न मिळाल्याची ओरड करत आहेत. याविषयी बोलता सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा फायदा मिळाला, ते सर्वांसमोर येऊन आमची कर्जमाफी झाल्याचं सांगत नाहीत. मात्र ज्यांना कर्जमाफीचा फायदा अद्याप मिळालेला नाही, ते शेतकरी सर्वांसमोर येऊन तक्रारी करत आहेत आणि त्यात काही चूक नाही. पात्र असलेले आणि अद्याप लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांचा असंतोष कॅमेऱ्यासमोर येतो. ज्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा फायदा मिळाला ते काहीही न बोलता ईव्हीएम मशिनचं बटन दाबतील. मात्र शेतकऱ्यांना असंतोष समोर येत असल्याने कर्जमुक्तीला लाभ न मिळाल्याच गैरसमज पसरतो आहे. सरकारची कर्जमुक्तीची प्रक्रिया अद्याप सुरु आहे आणि सर्व पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असल्याचं आश्वासन सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं.


काँग्रेसच्या 'न्याय' योजनेवर जनतेचा विश्वास नाही


सुधीर मुनगंटीवार यांना काँग्रेसच्या 'न्याय' योजनेवरही टीका केली. काँग्रेसच्या गरीबांना 72 हजार रुपये देण्याच्या 'न्याय' योजनेवर कोणीही विश्वास ठेवणार आहे. चार महिन्यांपूर्वी काँग्रेसने राजस्थानमध्ये बेरोजगारांना नोकरी देऊ किंवा भत्ता देऊ असं आश्वासन दिलं होतं,  ते आश्वासन हवेत विरलं. मध्य प्रदेशमध्येही शेतकरी कर्जमाफीमध्येही फसवणूक केली. राज्यातही मोफत वीज आणि रेशन दुकानांवर स्वस्त धान्य देण्याचं केवळ आश्वासन काँग्रेसने दिलं. जनतेने काँग्रेसला अनेकदा संधी दिली आहे, मात्र जनतेची निराशाच झाली. केंद्रात सत्ता आली नाही तरी काँग्रेसचं राज्य असलेल्या राज्यांमध्ये गरीबांना 72 हजार रुपये देण्याची योजना सुरु करु, असं राहुल गांधी का जाहीर करत नाही, असा सवालही सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.


राज ठाकरेंच्या सभांमुळे काहीही फरक पडणार नाही


राज ठाकरे सध्या राज्यात विविध ठिकाणी सभा घेऊन भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करु नका असं आवाहन जनतेला करत आहेत. यावरुन राज ठाकरेंवरही सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली. राज ठाकरेंच्या सभा आणि सभेतील गर्दी याचा मतांवर काहीही परिणाम होणार नाही. राजकारणात असे अनेक नेते होऊन गेले ज्यांच्या सभेला गर्दी नसायची, मात्र तरीही ते निवडून येत असत. भाषण देणं ही एक कला आहे, त्यामुळे सभेतील गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन होणार नाही, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं.


मुख्यमंत्री आणि मी चांगले मित्र


मुख्यमंत्र्यांसोबतच्या नात्याबाबतही सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री आणि मी चांगले मित्र आहोत. भाजप पक्षात कुणी मोठा नाही, कुणीही छोटा नाही, सर्वांना सन्मानाने वागणूक दिली जाते. आजवर मुख्यमंत्र्यांनी माझ्या कोणत्याही कामाला कधीही नाही म्हटलेलं नाही. आमचे विचार एक आहेत, त्यामुळे आमच्यात कधीही मतभेद निर्माण झाले नाहीत, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.


VIDEO | भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची तोंडी परीक्षा 



संबंधित बातम्या


तोंडी परीक्षा | पार्थ पवारांनी आजोबा, आत्याला कर्ज दिलं; सुप्रिया सुळे म्हणतात...


तोंडी परीक्षा | सुजय सगळ्यांचे पानिपत करायला समर्थ, तो जिंकणारच, राधाकृष्ण विखे पाटलांचा विश्वास


तोंडी परीक्षा | प्राध्यापक भरती प्रक्रिया सरकारी अधिकाऱ्यांमुळे रखडली, विनोद तावडेंचा आरोप


तोंडी परीक्षा : ...तर शरद पवार पंतप्रधान व्हावे : संजय राऊ


तोंडी परीक्षा | मुलंच नाही तर नातवंडंही पळवू : गिरीश महाजन