नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची दुसरी यादी आज जाहीर झाली. 21 उमेदवारांच्या या यादीत महाराष्ट्रातील पाच जागांवरील उमेदवारांच्या नावाचीही घोषणा झाली आहे. या दुसऱ्या यादीत उर्वरित सर्व 16 जागा या उत्तर प्रदेशातील आहेत. यामध्ये नाना पटोले यांना नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे नागपुरात नितीन गडकरी विरुद्ध पटोले अशी लढत रंगणार आहे.  दरम्यान दुसऱ्या यादीतही प्रियांका गांधी यांचं नाव आलेलं नाही.




काँग्रेसने महाराष्ट्रातील पाच जागांवरील उमेदवारांच्या यादीत नागपूरमधून नाना पटोले, सोलापूरमधून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, मुंबई उत्तर-मध्यमधून प्रिया दत्त, मुंबई दक्षिणमधून मिलिंद देवरा, गडचिरोली-चिमूर येथून डॉ. नामदेव उसेंडी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.



उत्तर प्रदेशातील असून यामध्ये नगिना येथून ओमवती देवी जटाव, मोरादाबाद येथून राज बब्बर, खेरीतून जाफर अली नक्वी, सितापूरमधून कैसर जहाँ, मिसरिख येथून मंजरी राही, मोहनलाल गंज येथून रामशंकर भार्गव, सुल्तानपूर येथून डॉ. संजय सिंह, प्रतापगढ येथून रत्ना सिंह, कानपूरमधून श्रीप्रकाश जैस्वाल, फतेहपूर येथून राकेश सचन, बहारिचमधून सावित्रीबाई फुले, संत कबीर नगर येथून परवेझ खान, बंसगाव येथून कुश सौरभ, लालगंजमधून पंकज मोहन सोनकर, मिर्झापूर येथून ललितेश त्रिपाठी आणि रॉबर्ट्सगंज येथून भगवती प्रसाद चौधरी या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने 7 मार्च रोजी पहिली यादी जाहीर केली होती.  यात 15 उमेदवारांच्या जागा जाहीर करण्यात आल्या होत्या.  पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशमधील अमेठीतून तर सोनिया गांधी या रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
VIDEO : काँग्रेसची पहिली यादी जाहीर, राहुल गांधी अमेठीतून तर सोनिया गांधी रायबरेलीतून लढणार



पहिल्या यादीत काँग्रेसने उमेदवार जाहीर केलेल्या 15 जागांपैकी 11 जागा उत्तर प्रदेशातील तर चार जागा गुजरातमधील होत्या. सलमान खुर्शीद हे फरुखाबादमधून नशीब आजमावणार आहेत.



राहुल गांधी अमेठीतून, सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघातून लढणार असल्याची घोषणा झाली असली तरी प्रियांका गांधी यांचं नाव तूर्तास यादीत आलेलं नाही. प्रियांका गांधी यांच्या प्रवेशानंतर सोनिया लोकसभा लढणार की नाही याबद्दल साशंकता होती, मात्र त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.