पुणे : पुणे आणि गडचिरोली... एक जिल्हा 'नक्षलग्रस्त' आणि दुसरा जिल्हा 'अभिमानग्रस्त'. मात्र मतांच्या टक्केवारीवर नजर टाकली तर पुणेकरांचा अभिमान गळून पडल्याची बातमी समोर आली आहे. गडचिरोलीतली मतदानाची टक्केवारी 71.98 टक्के आणि पुण्याची 49.84 टक्के.


लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 11 एप्रिल रोजी मतदान झालं. यात गडचिरोली-चिमूरसह विदर्भातील सात जागांचा समावेश होता. या टप्प्यात गडचिरोलीतमध्ये 71.98 टक्के मतदान झालं. तर तिसऱ्या टप्प्यात पुण्यातील मतदान पार पडलं. मात्र पुण्यात अवघं 49.84 टक्के मतदान झालं.

VIDEO | पुण्यात मतदान का कमी झालं?, पुणेकरांची कारणं ऐका !



खरंतर पुणेकर बोलण्यात कुणालाच बधत नाहीत. विषय कोणताही असो प्रतिक्रिया देण्यात पुणेकर कधीच हयगय करत नाही. मात्र जेव्हा क्रियेची वेळ येते, तेव्हा पेठांमधले काका, मंडईतले मामा आणि कोथरुडच्या काकू वामकुक्षी घेतात आणि जेव्हा मतदान का कमी झालं असं विचारल्यावर पुण्याचा तोरा खाडकन जागा होतो. मतदान करुन काय होतं, कोणताच नेता कामाचा नाही, अशी उत्तरं हमखास मिळतात.

सकाळी-सकाळी पेपराच्या घड्या मोडण्यात आणि चहाच्या कट्ट्यावर गप्पा झोडण्यात पुणेकरांना जगात तोड नाही. अहो पण गूडलक, वैशालीत बन मस्कावर ताव मारणारी आणि 'आमच्या वेळी पुणं असं नव्हतं,' असं म्हणणारी पेन्शनर जरी घराबाहेर पडली असती ना तरी मतांचा टक्का 50 च्या पार गेला असता आणि बोटावर शाई रंगवली असती तर समस्यांच्या पुणेरी पाट्या रंगवण्याची गरज पडली नसती.