रायगड : पंतप्रधान मोदी चढ्या आवाजात सांगत होते की, जर नोटाबंदी फसली तर मला भर चौकात शिक्षा द्या. आता नरेंद्र मोदींनी सांगायचंय चौक कुठला तो, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला आहे. महाडमधील जाहीर सभेत राज ठाकरे बोलत होते. माझ्या प्रचारातील पहिल्या टप्प्यातील ही शेवटची प्रचार सभा आहे. यापूर्वी राज ठाकरे यांनी नांदेड, सोलापूर, इचलकरंजी, सातारा, पुणे इथे सभा घेतली होती.


आजच्या सभेतही राज ठाकरे यांनी नोटाबंदी, मेक इन इंडिया, पुलवामा हल्ला, एअर स्ट्राईक यासह विविध मुद्द्यांवरुन नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जोडगोळीचा खरपूस समाचार घेतला. तसंच पंतप्रधान मोदी यांनी दत्तक घेतलेल्या गावाची दुर्दशा दाखवणारा व्हिडीओही दाखवला.

नोटाबंदीवरुन शरसंधान

राज ठाकरे यांनी नोटाबंदीच्या निर्णयावरुन नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, "नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना पाच वर्षात नक्की काय साधायचं होतं? नोटाबंदीतून जर काळा पैसा बाहेर काढायचा होता तर मग भाजपकडे निवडणुका लढवायला जो वारेमाप काळा पैसा आला आहे तो कुठून आला? रिझर्व बँकेच्या नुकत्याच आलेल्या अहवालात असं सांगितलं गेलंय की नोटाबंदीच्या आधी जितकं चलन बाहेत फिरत होतं त्याच्याहून दुप्पट तिप्पत चलन आता बाहेर फिरत आहे. आली कुठून ही रक्कम. ही कॅश निवडणुकीतून आली आहे.

नोटाबंदी फसली असं सगळे जण म्हणाले. 99.03 टक्के पैसे आरबीआयकडे परत आले. मग तुमच्या हाती काय लागलं? त्यावेळी पंतप्रधान मोदी चढ्या आवाजात सांगत होते की, जर नोटाबंदी फसली तर मला भर चौकात शिक्षा द्या. आता नरेंद्र मोदींनी सांगायचंय चौक कुठला तो. देशाची दुर्दशा करुन ठेवली या माणसाने. इथे नोटा बंद केल्या आणि त्या रात्री हा माणूस जपानला गेला. तिथल्या भारतीयांसमोर भाषण केलं की, कशी वाट लावली या भारताची."

दत्तक गावाची दुर्दशा

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी खासदार म्हणून दत्तक घेतलेल्या गावाची कधी दुर्दशा झाली आहे, हे सांगणारा व्हिडीओ दाखवला. जे गाव दत्तक घेतलं त्यात काहीच घडलं नाही. या गावात नाले साफ झालेले नाहीत. इथे ना विद्यालयं आहेत ना दवाखाना आहे. "स्वत: दत्तक घेतलेलं गाव ज्या गावाकडे हा माणूस पाहू शकला नाही, तो तुमच्याकडे पाहणार?" असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.

पहिल्या कॅशलेस गावाचा बोजवारा

तसंच मोदींनी जाहीर केलेल्या देशातील पहिलं कॅशलेस गावातील परिस्थितीही राज ठाकरे यांनी आजच्या भाषणात मांडली.  मुरबाडमधील धसई हे देशातील पहिलं कॅशलेस गाव असल्याचं पंतप्रधान मोदींनी जाहीर केलं होतं. पण या गावात एकच राष्ट्रीयकृत बँक असून या गावातील अनेकांचं बँक खातंही नाही, त्यामुळे त्यांचे सगळेच व्यवहार रोख रकमेत होतात, असं वास्तव राज ठाकरे व्हिडीओद्वारे मांडलं.

भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

ही निवडणूक देशात लोकशाही टिकणार का हुकूमशाही येणार हे ठरवणारी आहे. म्हणून नरेंद्र मोदी आणि अमित शाह ह्यांना राजकीय क्षितिजावरून हटवण्यासाठी मतदान करा.

आमच्या अटलजींच्या काळातही कारगील झालं होतं, पण त्यांनी त्याचा कधी बाजार मांडला नाही

नरेंद्र मोदींकडे दाखवण्यासारखं काहीच उरलं नाही त्यामुळे आता पुलवामात शहीद जवानांच्या नावावर मतं मागत आहे. आजपर्यंत कधीच झालं नाही, की पाकिस्तनाचा पंतप्रधान, भारताचा पंतप्रधान कोण असावा यावर बोलत आहेत. काय कारण आहे की इम्रान खान यांना मोदी भारताचे पंतप्रधान व्हावेत असं वाटतं?

देशातले धसई हे पहिलं कॅशलेस गाव आहे असं मोदींनी जाहीर केलं होतं. पण या गावात एकच राष्ट्रीयकृत बँक आहे आणि या गावात अनेकांचं बँक खातंही नाही, त्यामुळे त्यांचे सगळेच व्यवहार रोख रकमेत होतात : राज ठाकरे

जे जे 1930 मध्ये हिटलरने जर्मनीत करायचा प्रयत्न केला तोच सगळा प्रकार नरेंद्र मोदी 2014 पासून करायचा प्रयत्न करत आहेत. पण ते विसरले की सोशल मीडिया आता आहे जो तुम्हाला आरसा दाखवतो.

नोटाबंदीनंतर देश कॅशलेस होईल, असा दावा केला होता. निवडणुकीच्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादीमधली माणसं गायब करता, मग त्यासाठी कार्ड कुठे स्वाईप करता? : राज ठाकरे

मोदींनी खासदार म्हणून जे गाव दत्तक घेतलं त्यात काहीच घडलं नाही. गावात एकही सुविधा आली नाही. साधे नाले साफ नाही होऊ शकले ना महाविद्यालय ना दवाखाना आहे. स्वतः जे गाव दत्तक घेतलं ते जर तुम्ही नीट करु शकला नाही तो माणूस या देशाचं काय भलं करणार

पंडित नेहरू आणि इंदिरा गांधींनी काहीच केलं नाही म्हणून उठसूठ टीका करत राहायची. अरे जर नेहरु आणि इंदिरा गांधींनी जर काहीच केलं नसतं तर ज्या तांत्रिक प्रगतीच्या आधारावर खोटा प्रचार केला तो प्रचार करु शकले असते का?

बिहार मध्ये नरेंद्र मोदी म्हणाले एका आठवड्यात साडेआठ लाख शौचालयं बांधली. खोटं बोलायला काही मर्यादा?

रिझर्व बँकेच्या नुकत्याच आलेल्या अहवालात असं सांगितलं गेलंय की नोटबंदीच्या आधी जितकं चलन बाहेत फिरत होतं त्याच्याहून जास्त चलन आत्ता बाहेर आलंय. मोदी नोटबंदीच्या दरम्यान म्हणाले होते, जर नोटबंदी फसलं तर मला भर चौकात शिक्षा द्या. आता मोदींनी सांगायचा कुठला चौक निवडायचा.




नरेंद्र मोदी आणि अमित शाह ह्यांना ५ वर्षात नक्की काय साधायचं होतं? नोटबंदीतून जर काळा पैसा बाहेर काढायचा होता तर मग भाजपकडे निवडणुका लढवायला जो वारेमाप काळा पैसा आलाय तो आला कुठून?

वैमानिक अमोल यादवला मेक इन इंडियात त्याने इथे व्यवसाय सुरु करावा म्हणून महाराष्ट्र सरकारने वारेमाप आश्वासन दिली, शेवटी त्याला सरकारी यंत्रणेने इतकं जेरीस आणलं की हा मुलगा आता अमेरिकेत एका कंपनीबरोबर हा व्यवसाय सुरु करतोय

गेले ५ वर्ष हा देश नरेंद्र मोदी आणि अमित शाह चालवत आहेत आणि अगदीच तोंडदेखलं अरुण जेटलींना बोलवतात. नोटबंदीसारखा आततायी निर्णय लहरीपणातून घेतला. काय केलं मोदींनी? काँग्रेसच्या योजनांची नावं बदलली आणि त्याच योजना पुढे रेटल्या. हेच मोदींच कर्तृत्व

कोकण आणि केरळ यांच्यात भौगोलिक साम्य आहे. कोकण तर केरळपेक्षा खूप जास्त सुंदर आहे. केरळ पर्यटनात कुठे गेलं आणि कोकण मागेच राहिला तरीही याचं इथल्या लोकप्रतिनिधीना काही घेणं देणं नाही. कोकणाची पर्यटनाची क्षमता इतकी अफाट आहे की इथले तीन जिल्हे अख्ख्या महाराष्ट्राची काळजी घेऊ शकतं

शिवसेना-भाजपने एकमेकांना यथेच्छ शिव्या दिल्या आणि पुन्हा युती केली कारण दोन्ही पक्ष लाचार आहेत. पैसे आणि सत्ता ह्यासाठी ते वाट्टेल त्या तडजोडी करतील

नाणार प्रकल्प रद्द झाल्यावर त्यातील आंदोलक भेटले होते. तेव्हा मी त्यांना सांगितलं की बेसावध राहू नका कारण हे निवडणुकांपुरत प्रकल्प रद्द केल्यासारखं दाखवतील आणि पुन्हा डोकं वर काढतील

तुम्ही मागे काय घडलं, काय बोललं गेलं हे विसरून जाता म्हणून हे पुढारी तुम्हाला गृहित धरतात

नाशिकला महापालिका निवडणुकांच्या वेळेस मी कामांचं सादरीकरण केलं होतं. तेव्हापासूनच माझ्या डोक्यात होतं प्रचाराचं सादरीकरण असंच असायला हवं, गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही हे व्हिडीओ काढत आहोत : राज ठाकरे