नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्लॉग लिहून काँग्रेसवर आरोप केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर वंशवादाचे आरोप केले आहेत. माध्यमांपासून ते संसदेपर्यंत, सैनिकांपासून ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यापर्यंत, संविधानापासून ते न्यायालयापर्यंत, प्रत्येक संस्थेला अपमानित करणे ही काँग्रेसची संस्कृती आहे. म्हणजे खाते आणि वही जे काँग्रेस सांगेल तेच सही, अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर टीका केली आहे.


‘संस्थात्मक आदर आणि संस्थात्मक द्वेष–दोन विभिन्न दृष्टिकोन’ या शीर्षकाखाली मोदींनी ब्लॉग लिहिला आहे. 2014 च्या उन्हाळ्यात लोकांनी घराणेशाहीला नाकारुन लोकशाहीला निवडलं होतं. विनाशाला नाही तर विकासाला निवडलं होतं, शिथिलतेला नाही तर सुरक्षेला निवडलं होतं, विरोधाला नाही तर संधीला प्राधान्य दिलं होतं, वोट बँकेच्या राजकारणाला बाजूला सारुन विकासाच्या राजकारणाला निवडलं होतं, असे मोदींनी म्हटले आहे.

मोदींनी म्हणाले की,  आपण जेव्हा मतदान करण्यासाठी जालं तेव्हा एक गोष्ट जरुर लक्षात ठेवा की, कशा प्रकारे एका कुटुंबाच्या सत्तेच्या लालसेपोटी देशाने मोठी किंमत चुकवली आहे. काँग्रेसने देशाला नेहमीच संकटात टाकलं आहे, यंदाही ते असंच करतील. त्यामुळे लक्षात ठेवा जर आपल्याला आपले स्वातंत्र्य राखायचे असेल तर आपल्याला प्रत्येक वेळी सतर्क रहायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे.