नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानही पार पडलं आहे. अशा परिस्थितीत आज पुन्हा एकदा विरोधकांनी ईव्हीएम विरोधात आवाज उठवला आहे.


दिल्लीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, टीडीपी नेते चंद्राबाबू नायडू, आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, कपील सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांच्यासह काही नेत्यांनी पत्रकार परिषद घेत ईव्हीएमबद्दल पुन्हा एकदा शंका उपस्थित केली.


निवडणूक आयोग योग्यरित्या काम करत नाही, तसेच ईव्हीएममध्येही बिघाड आहे. एकाला मत दिल्यावर ते दुसऱ्याला जात आहे. व्हीव्हीपॅटमध्ये फक्त 4 सेकंदच फोटो दिसतो. त्यामुळे ईव्हीएमच्या मुद्द्यावर विरोधक पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावणार असल्याचं सिंघवी यांनी म्हटलं. ईव्हीएम मशीनमधील काही बटन खराब आहेत. ज्या ठिकाणी भाजपचं वातावरण नाही, तिथे मशीनमध्ये बिघाड केले जात असल्याचा गंभीर आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.


VIDEO | ईव्हीएमच्या मुद्द्यावर विरोधक पुन्हा एकवटले, ईव्हीएममध्येही बिघाड असल्याचा आरोप | नवी दिल्ली | एबीपी माझा


व्हीव्हीपॅटमधील 50 टक्के स्लिप मोजल्या गेल्या पाहिजेत. सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी आपल्या एका निर्णयात व्हीव्हीपॅट मशीनमधील स्लिपची मोजणी वाढवली पाहिजे असं म्हटलं होतं. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अमंलबजावमी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसने केली आहे. तसेच ही मागणी करणारे 21 पक्ष देशातील 70 टक्के जनतेंच प्रतिनिधित्व करतात हे देखील सांगितलं.


VIDEO | राहुल गांधींना कोठडीत फटके खायला लावा - उद्धव ठाकरे