मुंबई : देशातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवाला अर्थात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा आरंभ आजपासून होत आहे.   2019 च्या लोकसभा निवडणुकीमधील पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. महाराष्ट्रात विदर्भातल्या सात मतदारसंघांसह देशभरातील 91 जागांसाठी मतदान होणार आहे. देशातील अनेक दिग्गज उमेदवारांचे भविष्य आज ईव्हीएममध्ये कैद होणार आहे.


महाराष्ट्रात नितीन गडकरी, माणिकराव ठाकरे, हंसराज अहिर, नाना पटोले यासारख्या दिग्गज नेत्यांसह 116 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहेत. राज्यासह देशातील आणखी काही महत्वाच्या उमेदवारांची आज अग्निपरीक्षा आहे.

या मोठ्या नेत्यांची अग्निपरीक्षा

नागपूरमधून गडकरींना पटोलेंचे आव्हान  

महाराष्ट्रातील नागपूर लोकसभेतून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांचा मुकाबला भाजपमधून बंद करून काँग्रेसमध्ये गेलेल्या नाना पटोले यांच्याशी होत आहे.  नाना पटोले राज्यातील एक चर्चेतील नेते आहेत.  2014 लोकसभेत ते भंडारा-गोंदियातून भाजपचे खासदार होते. त्यावेळी त्यांनी प्रफुल्ल पटेल यांचा पराभव करत लोकसभा गाठली होती. मोदींच्या धोरणांवर टीका करत त्यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसकडून नितीन गडकरींना आव्हान दिले आहे.

 हंसराज अहिर यांच्यासमोर धानोरकर यांचे आव्हान

केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर चौथ्यांदा चंद्रपुरातून खासदारपदी विराजमान होण्यास उत्सुक आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेल्या बाळू उर्फ सुरेश धानोरकरांचं आव्हान आहे.

गौतमबुद्ध नगरमधून  केंद्रीय मंत्री महेश शर्मा मैदानात

पर्यटनआणि सांस्कृतिक  मंत्री महेश शर्मा गौतमबुद्ध नगर मतदारसंघातून आपले नशीब आजमावत आहेत. त्यांनी 2014 मध्ये सपाचे उमेदवार नरेंद्र भाटी यांचा पराभव केला होता. यावेळी शर्मा यांचा सामना एसपी-बीएसपीचे सतबीर नागर आणि काँग्रेसच्या डॉक्टर अरविंद चौहान यांच्याशी आहे.

अजीत सिंह आणि  संजीव बालियान यांच्यात लढत

मुजफ्फरनगर लोकसभा मतदारसंघ एक हाय प्रोफाइल सामना आहे.  या जागेवरून दोन माजी केंद्रीय मंत्री मैदानात आहात.  संजीव बालियान आणि अजीत सिंह या दोन दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.  2014 मध्ये संजीव बालियान यांनी कादिर राणा यांचा पराभव केला होता.

माजी लष्करप्रमुख वीके सिंह

माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय मंत्री जनरल वी.के. सिंह दुसऱ्यांदा लोकसभेच्या मैदानात आहेत. गाजीयाबाद मतदारसंघात त्यांनी २०१४ मध्ये काँग्रेस नेते राज बब्बर यांचा पराभव  केला होता. त्यावेळी त्यांनी सर्वाधिक मतं घेतली होती. यावेळी त्यांचा सामना सपा - बसपाचे  सुरेश कुमार बंसल आणि कांग्रेसच्या  डॉली शर्मा यांच्याशी आहे.

किरण रिजिजू- अरुणाचल पश्चिम  

अरुणाचलचे रिजिजू मोदी सरकारमध्ये गृह राज्य मंत्री आहेत. यावेळी त्यांची प्रतिष्ठा देखील पणाला लागली आहे.  2014 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या ताकम संजॉय यांचा पराभव केला होता. नॉर्थ-ईस्ट मध्ये किरण रिजिजू भाजपचा मोठा चेहरा आहेत.

बागपत मधून सत्यपाल सिंह रिंगणात

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह पुन्हा लोकसभेच्या निवडणुकीसाठी बागपतमधून रिंगणात आहेत. 2014 मध्ये त्यांनी आरएलडीचे  प्रमुख अजित सिंह यांचा पराभव केला होता. यावेळी त्यांना अजित सिंह यांचे पुत्र जयंत चौधरी यांच्याशी सामना आहे. चौधरी यांना सपा आणि बसपाने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सत्यपाल सिंह यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.

हैदराबादमधून असदुद्दीन ओवैसी मैदानात  

एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा हैदराबादमधून मैदानात आहेत. या जागेवरून त्यांनी  2004, 2009 आणि 2014 मध्ये निवडणूक जिंकली आहे.

पहिल्या टप्प्यात 20 राज्यांमधील 91 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू काश्मिर, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, ओदिशा, सिक्कीम, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप या राज्यांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

'या' कारणामुळे मतदानाची वेळ दीड तासाने वाढवली

लोकसभा निवडणूक 2019 | महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान, मतमोजणी 23 मे रोजी

पहिल्या टप्प्यातील प्रचारतोफा थंडावणार, विदर्भातील सात मतदारसंघांमध्ये मतदान