भाजपला 2014 मधील लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत मोठा विजय मिळाला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठी अस्वस्थता पसरली होती.
काँग्रेसचे नेते रतन सिंग निवडणुकांचे कल जाणून घेण्यासाठी मतमोजणी केंद्रावर गेले होते. रतन सिंग हे मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यात काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यावेळी निकाल पाहून त्यांच्या छातीत दुखू लागलं.
छातीदुखी वाढल्याचं त्यांनी काही कार्यकर्त्यांनाही सांगितलं. तेवढ्यातच ते जागेवर कोसळले. रतन सिंग यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.
देशभरातील महत्त्वाच्या लढतींमध्ये भोपाळ मतदारसंघाचा समावेश आहे. भोपाळ मतदारसंघ हा भाजपचा गड मानला जातो. इथे काँग्रेसकडून दिग्विजय सिंग रिंगणात आहेत, तर भाजपने साध्वी प्रज्ञा सिंग यांना रिंगणात उतरवलं आहे.
भाजपने या मतदारसंघातून साध्वी प्रज्ञा यांना उमेदवारी दिल्यापासून हा मतदारसंघ चर्चेत होता. सर्वांचं लक्ष या मतदारसंघाच्या निकालाकडे लागलं होतं. उमेदवारी जाहीर झाल्यापासून साध्वी प्रज्ञा सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करत होत्या, त्यामुळे भोपाळ मतदारसंघ चर्चेत राहिला आहे.
11 वर्षांपूर्वी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले माजी एटीएसप्रमुख हेमंत करकरेंबाबत आणि त्यानंतर बाबरी मशिदीबाबत साध्वी प्रज्ञा यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे गदारोळ माजला होता. देशभरातून साध्वी यांच्यावर टीकाही झाली. तरीसुद्धा मतदारांनी साध्वी यांच्या बाजूने कौल दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं आहे.