लखनौ : लोकसभा निवडणुका नियोजित वेळेनुसारच होणार, असं मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी स्पष्ट केलं. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं.


भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाचा निवडणुकांवर काही परिणाम होणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. त्यावर 'देशातील लोकसभा निवडणुका वेळेवरच होतील' असं उत्तर अरोरा यांनी दिलं. लोकसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ते गेल्या दोन दिवसांपासून उत्तर प्रदेशात आहेत.

निवडणूक आयोगाच्या नवीन अधिसूचनेनुसार उमेदवारांना त्यांच्या परदेशातील मालमत्तेचीही माहिती द्यावी लागणार आहे. आयटी विभाग यामध्ये लक्ष घालणार असून माहितीमध्ये विसंगती आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.

एक लाख 63 हजार 331 मतदान केंद्र, व्हीव्हीपॅट मशिन्स यावेळी वापरली जाणार असल्याची माहितीही निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली. सोशल मीडियावर नजर ठेवण्यासाठी समिती स्थापन करणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.