लातूर : लातूर लोकसभा मतदारसंघ कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता मात्र 2009 पासून उतरती कळा लागली. 2014 साली सुनील गायकवाड यांनी अडीच लाख मते घेत भाजपाची मजबूत पकड तयार केली. आज जिल्ह्यात सर्वत्र भाजपाचा बोलबाला आहे. नगरपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हापरिषद,आणि महानगरपालिका काँग्रेसकडून खेचून आणण्यात भाजपाला यश आले. विधानसभेपूर्वी जोर आजमाईश रंगणार आहे. आता लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या टीममधील खेळाडूचे बलाबल पाहुयात.


लातूर काँग्रेसचे कर्णधार आहेत अमित विलासराव देशमुख. विलासराव देशमुख यांचा राजकीय वारसा ते चालवत आहेत. मात्र विलासराव यांच्या अकाली जाण्यामुळे पक्षात त्याचे शत्रूच जास्त निर्माण झाले आहेत. याचा फटका त्यांना वेळोवेळी बसत आहे. जिल्ह्यातील जेष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर, शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि दिलीपराव देशमुख यांच्या सारखी मोठी नावे बरोबर आहेत. मात्र हे सर्वजण मिळूनही जिल्ह्यावर पकड निर्माण करू शकत नाहीत.

यांची नावे मोठी आहेत मात्र आजमितीच्या राजकारणात हे सर्व सल्लगार मंडळात दाखल झाले आहेत. आजघडीला काँग्रेसचा जिल्ह्याभरात एकच चेहेरा आहे तो स्व:ता अमित देशमुख यांचा. नाही म्हणायला औसाचे आमदार बसवराज पाटील मुरूमकर काँग्रेसमध्ये आहेत मात्र त्याचे लक्ष उस्मानाबादेत जास्त रमते. गटा तटाचा वाद नको यामुळे ते लातूर जिल्ह्यातील राजकारणात अंग चोरून राहतात.

मारोती महाराज साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी भाजपा काँग्रेसमधील वादात तटस्थ भूमिका घेतली होती. त्यांचे वेट अॅण्ड वॉच धोरण काँग्रेससाठी घातक ठरत आहे. त्याला देशमुखांच्या एकहाती सत्ता असतानाच्या वागणुकीची ही किनार आहे. लातूर ग्रामीण मधील आमदार त्र्यंबक भिसे यांनाच देशमुखांवर अवलंबून राहावे लागत असल्याने तेथून मदत मिळणे अवघड आहे.

2014 साली काँग्रेसच्या हातून लोकसभा गेली आणि परभवाची मालिका सुरु झाली. हातून नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हापरिषद आणि लातूर महानगरपालिका गेली. भाजपातील तरुणांच्या राजकीय डावपेचाला मोदी लाटेचे अस्तर मिळाले आणि आमदार संभाजी पाटील झिरो ते हिरो ठरले. त्यावेळी काँग्रेसच्या कोणत्याही ज्येष्ठ नेत्याने मैदानात उतरण्याची तयारी दाखवली नाही. नावापुरते काही सभांना हजेरी लावली होती त्याच वेळी दिशा आणि दशा स्पष्ट झाली होती.

या महायुद्धात शरपंजरी पडलेले जेष्ठ आणि तरुणाची नसलेली साथ, भाजपात जाणाऱ्या कार्यकर्त्यांना थांबविण्यात आलेले अपयश त्यांचे बंधू धीरज यांच्यासाठी लातूर ग्रामीणमध्ये सुरु असलेल्या मशागत यातून बाहेर येण्यासाठीच अमित देशमुखांची बरीच ताकद खर्ची पडत आहे. लोकसभेसाठी तयारी सुरु केली त्यांच्या मताने उमेदवार फायनल होत नव्हता. त्यातच ज्येष्ठांचे सल्लगार मंडळ नको ते प्रश्न निर्माण करत होते आणि पक्षांतर्गत अशोक चव्हाणांची मर्जी सांभाळताना अमित देशमुखाची तारेवरची कसरत होत होती.

अशोक चव्हाणांच्या गटातील राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये आलेले मछिंद्र कामंत यांची वर्णी लागली आहे. आता हा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी अमित देशमुखांच्या खांद्यावर आली आहे. लोकसभेच्या जय-पराजयावरच अमित देशमुखांचे विधानसभेतील गणिते अवलंबून आहेत. या विजयातूनच लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामधून बंधू धीरज देशमुखांसाठी सुरु असलेली तयारी आणि स्वतासाठी लातूर शहर विधानसभा मतदारसंघ पुन्हा काबीज करण्याचा मार्ग सुकर होणार आहे. मात्र नित्यनेमाने काँग्रेसची होणारी वाताहात, रस्त्यावर उतरून संघर्ष न करण्याची वृत्ती आणि पराभूत मानसिकता यातून बाहेर येण्यासाठी विधानसभेपूर्वी एका विजयाची त्यांना गरज आहे.

विलासराव देशमुख यांनी त्यांच्या कार्यकाळातील शेवटच्या महानगरपालिका निवडणूक प्रचारात एक वाक्य बोलले होते त्याचा वापर काँग्रेस आजही करत आहे. 'आता ही सर्व जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतोय'. हेच वाक्य काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीने अमित देशमुखसाठी वापरलं आहे. यात ते किती यशस्वी होतील ते 23 मे नंतर समोर येईलच.