मुंबई: निवडणूक आयोग हा देशावर लागलेला कलंक असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. आपल्या मृत वडिलांचे नाव मतदारयादीत असल्याने आणि अनेक लोकांची नावं मतदारयादीतून गहाळ झाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.


एबीपी माझाशी बोलताना आव्हाड म्हणाले की, इलेक्शन कमिशन हे देशावर कलंक आहे. आयोगाकडून अतिशय वाईट काम सुरू आहे.  माझे वडील 2 वर्षांपूर्वी वारले. त्यांचे नाव अजून मतदारयादीत आहे. दुसरीकडे जिवंत आहेत त्यांची नावे अजून सापडत नाहीत, असे ते म्हणाले. ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल करून व्यवस्था सुधारायला हवी, असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी त्यांनी शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांना तात्काळ अटक का करण्यात आली नाही? त्यांना सोडलेच कसे?, असा सवालही केला. या सरकारचा प्रचंड दबाव या पोलीस प्रशासनावर आहे, त्यामुळे असे प्रसंग घडत आहेत, असेही ते म्हणाले.

आमदार रवींद्र फाटक यांच्या गाडीत रोकड असल्याची तक्रार करत बविआने जवळपास तीन तास फाटक यांची गाडी अडवून धरत बॅग तपासणीची मागणी केली होती. यामुळे राञी एक ते तीन वाजेपर्यंत नालासापोरा पूर्वेकडे तणावाचं वातावरण होतं.

पालघरमध्ये एका महिलेचे 68 वेळा मतदारयादीत नाव, यादीत हजारो बोगस नावं असल्याचा शिवसेना, बविआचा आरोप

पालघर लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात मतदान होत आहे. या मतदारसंघात शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीमध्ये मुख्य लढत होत आहे. दरम्यान मतदानाच्या आधी शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीने मतदार यादीमध्ये हजारो नाव बोगस असल्याचा आरोप  निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केला आहे.

बविआने 60 हजार मतदारांची नावे दुबारा आल्याचा आरोप केला आहे. तर शिवसेनेने 56 हजार मतदारांची दोनदा नावे असल्याचा आरोप केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे एकाच महिलेचे 68 वेळा मतदारयादीत नाव असल्याचं देखील निदर्शनास आलं आहे.

शिवसेनेने पालघर लोकसभा मतदारसंघातील मतदारयादीची चिरफाड करून बोगस मतदार असल्याचं सांगितलं आहे.  या यादीत 56 हजार मतदारांची दोन वेळा तर इतर हजारो मतदारांची तीन, चार, पाच वेळा नावे आली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे सुरेखा सुरेश पाटील या महिलेचे तब्बल 68 वेळा नाव मतदार यादीत आले आहे. ही गंभीर बाब शिवसेनेने निवडणूक यंत्रणेच्या निदर्शनास पुराव्यासह आणून दिली असून कारवाई करण्याची मागणी केली आहे.