मुख्यमंत्री यांनी केलेल्या 'आम्ही तेल लावून तयार आहोत, पण समोर कोणी पैलवान नाही', या वक्तव्यावर बोलताना पाटील यांनी आम्ही मातीतील कुस्ती खेळणारी माणसं आहोत, मुख्यमंत्र्यांनी स्वत:चा तेल लावलेला एक फोटो प्रसिद्ध करावा. एकदा कळू द्या तेल लावल्यावर ते कसे दिसतात, अशा शब्दात जयंत पाटलांनी फडणवीसांची खिल्ली उडवली. यावेळी स्वत: जयंत पाटील यांना हसू आवरत नव्हते.
भाजपा सरकारने ईडीची कारवाई करून शरद पवारांच्या विरोधात कट कारस्थान करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे महाराष्ट्रातील तरुण आज पेटून उठला आहे. भाजप-सेनेला महाराष्ट्राची जनता धडा शिकवेल आणि राज्यात काँग्रेस आघाडीची सत्ता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली आहे. पण महाराष्ट्र पवारांच्यावरील अशी खालच्या पातळीवरील टीका सहन करणार नाही,असा इशारा जयंत पाटील यांनी दिला. आज राज्यात निवडणुकीची परिस्थिती बदलत आहे. काँग्रेस -राष्ट्रवादीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता येणार असल्याचा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.