सिंधुदुर्ग : आदित्य ठाकरेंसोबत नितेश राणे यांनी काम करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर माजी खासदार निलेश राणे यांनी विरोध करत ट्वीट केलं होतं. त्यानंतर याचा खुलासा करत नितेश राणे आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत नसल्याचं निलेश राणे यांनी स्पष्ट केलंं आहे. निलेश राणे मरेल त्याच वेळी नितेशची साथ सोडली जाईल, असंही निलेश राणेंनी सांगितलं. माझ्या ट्वीटचा अर्थ वेगळा घेतला गेला. पण शिवसेनेने आमचा तिरस्कर करायचा आणि आम्ही त्यांना काय ओवाळायचं? ज्या दिवशी शिवसेना माघार घेईल त्याच वेळी आम्ही शांत राहू, असंही ते म्हणाले.


नितेश राणेंची भूमिका आणि निलेश राणेंचं ट्वीट
शिवसेनेचा विरोध असतानाही भाजपने नारायण राणेंचे पुत्र नितेश राणेंना कणकवलीमधून उमेदवारी दिली. युतीचे उमेदवार असल्याने नितेश राणेंनीही मवाळ भूमिका घेत शिवसेनेवर टीका करणार नसल्याची भूमिका घेतली. मात्र नितेश राणेंची शिवसेना आणि ठाकरेंसोबत निवडणुकीत काम करणार असल्याची भूमिका निलेश राणे यांना पटली नाही. त्यामुळे त्यांनी नितेश राणेंच्या वक्तव्याच्या ट्वीटद्वारे विरोध केला. "नितेशच्या या विषयाशी मी जराही सहमत नाही. ज्या पक्षाने राणे साहेबांना त्रास दिला, माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेशी दोन हात केले, केसेस घेतल्या, संघर्ष केला त्यांना हे कधीच सहन होणार नाही. राजकारण आपल्या ठिकाणी पण वार मी समोरुनच करणार", असं ट्वीट निलेश राणेंनी केलं.

Nitesh Rane VS Nilesh Rane | नितेश राणेंची शिवसेनेबाबत मवाळ भूमिका, निलेश राणेंचा विरोध कायम

निलेश राणे यांचं स्पष्टीकरण
"माझ्या विधानाचा अर्थ चुकीचा अर्थ लावला गेला. एकविसाव्या शतकात नितेश राणेसारखा भाऊ सापडणं हे माझं भाग्य आहे. तुम्ही काय चाललं होतं ते राणे कुटुंबाचा हे कुठून आला, कसं आला हे मला काय माहिती नाही. कुठल्याही विषयावर दोघांची मते वेगळी असू शकतात. निलेश राणे मरेपर्यंत नितेशची साथ सोडणार नाही. तुम्हाला जसं वाटतं तसं जिवंतपणी तरी काही होणार नाही. त्यांची साथ मी आयुष्यभर सोडणार नाही," असं निलेश राणे यांनी ठामपणे सांगितलं.

निलेश राणे म्हणाले की, "गेली पंधरा वर्षात जे काही घडले ते मी तरी विसरु शकत नाही. परवाच सुभाष देसाई काय बोलून गेले, आमचा राणे या व्यक्तीला विरोध आहे. त्यामुळे जे आमच्या कुटुंबाचा तिरस्कार करतात, त्यांना आम्ही काय सोडायचं? त्रास फक्त बाळासाहेबांना झाला का, आमच्या साहेबांना त्रास झाला नाही का? सुरुवात त्यांनी केली, त्यामुळे आम्ही आमची बाजू मांडत असतो. आम्ही त्यांच्या अंगावर गेलो नाही. ज्या दिवशी शिवसेना माघार घेईल त्या दिवशी आम्ही गप्प बसू. शिवसेनेतून कोणीही टपोरी आमदार-खासदार उठणार आणि आमच्या राणे साहेबांवर टीका करणार हे ऐकून घेणार नाही. शिवसेना जोपर्यंत माघार घेत नाही तोपर्यंत उत्तर देणारच."