लखनौ : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावरुन भाजपने प्रश्न उपस्थित केले आहेत. अमेठीतून राहुल गांधी यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवणारे अपक्ष उमेदवार ध्रुव लाल यांचे वकील रवी प्रकाश यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली आहे. रवी प्रकाश यांनी आरोप केला आहे की, "राहुल गांधी यांनी ब्रिटनचे नागरिकत्व घेतले होते, त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी."


रवी प्रकाश यांनी ब्रिटनमध्ये रजिस्टर्ड असलेल्या एका कंपनीच्या कागदपत्रांच्या आधारावर हे आरोप केले आहेत. तसेच राहुल गांधी यांच्या शैक्षणिक योग्यतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ध्रुव लाल आणि रवी प्रकाश यांनी मांडलेले मुद्दे भाजपने हायजॅक करत राहुल गांधींकडे याप्रकरणी स्पष्टीकरण मागितले आहे.

VIDEO | राहुल गांधींची अमेठीतून उमेदवारी रद्द करा : भाजप | एबीपी माझा



याप्रकरणी भाजप नेते जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, "निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांचे वकील राहुल कौशिक यांच्याकडे याप्रकरणी स्पष्टीकरण मागितले. परंतु कौशिक यांच्याकडे याबाबत पुरेशी माहिती नसल्यामुळे ती मिळवण्यासाठी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे वेळ मागितला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना सोमवारपर्यंतची वेळ दिली आहे. मला याबाबत खूप आश्चर्य वाटतंय की, राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे आणि गांधींनी त्याबाबत उत्तर दिलेले नाही."


VIDEO | राहुल गांधी नाही तर राऊल विंची? | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा