मुंबई : घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघाचा इतिहास क्वचित बदलणारा असा आहे. कारण काँग्रेसचे वीरेंद्र बक्षी हे चार वेळा या विधानसभेतून आमदार होते आणि काँग्रेसचा हा गड अभेद्य असा होता. 1984 ला विद्यमान आमदार प्रकाश मेहता हे पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढले आणि हरले. काँग्रेसचे वीरेंद्र बक्षी त्यावेळेस चौथ्यांदा घाटकोपर पूर्व विधानसभेतून निवडून आले. हा पराभव प्रकाश मेहता यांच्या जिव्हारी लागणारा होता. पुढील पाच वर्ष प्रकाश मेहता यांनी या विधानसभेत प्रचंड मेहनत घेतली आणि 1989 ला काँग्रेसच्या या अभेद्य मानल्या जाणाऱ्या गडाला खिंडार पाडत येथे पहिल्यांदा भाजपचं कमळ फुलवलं. त्यानंतर सलग सहा वेळा प्रकाश मेहता घाटकोपर पूर्व विधानसभेतून आमदार म्हणून विधानसभेवर गेले आहेत.


प्रकाश मेहता यांची पार्श्वभूमी
प्रकाश मेहता हे मूळचे सौराष्ट्रचे. ते अगदी लहान वयातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य झाले. 1975-77 ला लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी सुरू केलेल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात प्रकाश मेहतांनी अग्रीम सहभाग घेतला. ज्यामुळे ते लोकांच्या नजरेत आले आणि नंतर भारतीय जनता पार्टीचे सदस्य झाले. मंडळ सचिवपासून ते भाजपचे मुंबई अध्यक्षपद प्रकाश मेहता यांनी भूषविले आहे. प्रकाश मेहता हे भाजपचे एकमेव असे आमदार आहेत ज्यांनी सलग 5 वेळा मुंबई शहरातून निवडणूक जिंकली आहे. याचीच पोचपावती म्हणून प्रकाश मेहता यांना राज्याचे गृहनिर्माण मंत्री करण्यात आले. परंतु प्रकाश मेहता यांना आपली कारकीर्द पूर्ण करता आली नाही आणि पार वर्षांआधीच गृहनिर्माण घोटाळ्यामुळे प्रकाश मेहता यांना त्यांच्या पदावरून पायउतार व्हावे लागले.

प्रकाश मेहता यांची घाटकोपर मध्ये केलेली कामे
मतदारसंघात त्यांनी अनेक उद्यानं बनवली आहेत.
जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अफजलपूर कमिटीची स्थापणा केली आहे.
जवळपास 1 लाख झोपडीधारकांना इमारतींमध्ये घर दिल्याचा दावा भाजपकडून करण्यात येतो.

घाटकोपर पूर्व विधानसभेची भौगोलिक स्तिथी
घाटकोपर पूर्व विधानसभा क्षेत्रात मोठा भाग व्यापला आहे तो इमारतींनी. जवळपास 30 टक्के लोक झोपडपट्टीत राहतात. बहुतांश भागात पुनर्विकासाची कामं सुरु आहेत.

मतदारांची आकडेवारी
घाटकोपर पूर्व विधानसभेत एकूण 239 बूथ आहेत, ज्यामध्ये 2 लाख 39 हजार मतदार आहेत. यामध्ये 50 टक्के गुजराती मतदार आहेत. 40 टक्के मराठी मतदार तर 10 टक्के इतर मतदार आहेत. प्रकाश मेहता यांच्या विधानसभेत नगरसेवकांचे 5 वॉर्ड येतात. यामध्ये भाजपचे 2, शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 नगरसेवक आहे.

राजकीय समीकरण काय असतील
काँग्रेसकडून राजा मिराणी, विरेंद्र बक्षी आणि अशोक भानुशाली यांच्या नावांची चर्चा आहे. वीरेंद्र बक्षी यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार जर घाटकोपर पूर्व विधानसभा क्षेत्रातून लढला तर ती औपचारिकता असेल. भाजप आणि शिवसेनेची युती न झाल्यास शिवसेनेकडून परमेश्वर कदम यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळू शकते.

भारतीय जनता पक्षाकडून प्रकाश मेहता, काँग्रेसमधून भाजपत आलेले प्रवीण छेडा आणि मुंबई महानगरपालिकेतले सर्वात श्रीमंत नगरसेवक पराग शाह यांच्या नावांची चर्चा आहे. प्रकाश मेहता यांचा अनुभव आणि पक्षातील वरिष्ठांशी असलेले संबंध त्यांच्या पारड्यात पुन्हा विधानसभेचं तिकीट टाकू शकतात. परंतु पक्षाला नवा चेहरा हवा असेल छेडा किंवा शाह यांना संधी मिळू शकेल.

भाजप गड राखेल का?
गुजराती आणि मराठी मतदार येथे मोठ्या प्रमाणात आहेत. युती झाली तर भाजप हा गड सहज राखेल. परंतु त्यांचा शिलेदार कोन असेल हा एक मोठा प्रश्न आहे.