नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनची (ईव्हीएम) विश्वासार्हता वाढावी यासाठी निवडणूक आयोगाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यापैकी महत्त्वाचा निर्णय म्हणजे लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्व ठिकाणी व्हीव्हीपॅट (व्होटर-व्हेरिफायड पेपर ऑडिट ट्रेल) मशीन्सचा वापर करणे अनिवार्य केले आहे. तसेच ईव्हीम मशीनवर उमेदवारांची छायाचित्रे उपलब्ध करणे, मशीनवर जीपीएसद्वारे लक्ष ठेवणे, असे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.


व्हीव्हीपॅट मशीन्सचा सार्वत्रिक वापर करण्याची यंदाची पहिलीच वेळ आहे. तसेच इव्हीएम हॅक होऊ नये, मशीनसोबत छेडछाड होऊ नये, ईव्हीएम मशीनवर निवडणूक आयोगाचा संपूर्ण ताबा रहावा यासाठी ईव्हीएम मशीन्सवर जीपीएसद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. आगामी मतदानावेळी ईव्हीएममध्ये करण्यात आलेला सर्वात मोठा बदल म्हणजे, सर्व इव्हीएम मशीन्सवर उमेदवारांचे छायाचित्रही पाहायला मिळणार आहे.

2014 मध्ये भारतीय जनता पक्षाचं देशात बहुमताचं सरकार निवडून आलं. त्यानंतर झालेल्या अनेक विधानसभा निवडणुका भाजपने सहज जिंकल्या. त्यानंतर काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांकडून आरोप होऊ लागले की, भाजपने ईव्हीएम मशीन हॅक केले आहेत. विरोधक सातत्याने मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी करत आहेत. त्यानंतर ईव्हीएमची विश्वासार्हता वाढावी, ईव्हीएमशी कोणत्याही प्रकारची छेडछाड होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने ठोस पावलं उचलली आहेत.

दरम्यान, आज (रविवार)निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक जाहीर केली असून आजपासून देशभरात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. देशभरात 11 एप्रिल 2019 ते 19 मे 2019 या कालावधीत सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर गुरुवारी 23 मे 2019 रोजी निवडणुकांचे निकाल हाती येतील. महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये म्हणजेच 11, 18, 23 आणि 29 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे.