अहमदनगर : राहुरी विधानसभेचे विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी अहमदनगर जिल्ह्यातील काही समाजसेवकांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मिलिंद मोभारकर, अमोल जाधव आणि शंकर राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. तसंच कर्डिले यांना उमेदवारी मिळाली तर अनेक पीडित नागरिक मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर आत्मदहन करतील, असंही त्यांनी आपल्या परिपत्रकात म्हटलं आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आज (13 सप्टेंबर) अहमदनगरच्या अकोलेमधून सुरुवात होत आहे. 13 आणि 14 सप्टेंबर असे दोन दिवस ही यात्रा नगरमध्ये आहे. तर राहुरीमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर या मोभारकर, जाधव आणि राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. अहमदनगरमधील गुन्हेगार आणि कायदा पायदळी तुडवणाऱ्या आमदार शिवाजी कर्डिले यांना पाठीशी घालण्याचं काम सोडून द्यावं, तसंच आगामी निवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.

शिवाजी कर्डिले हे नगर जिल्ह्यात गाजलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्याकांडातील आरोपी आहेत. लाचलुचपत विभागाकडे अनेक तक्रारी व पाठपुरावा करुनही आमदार शिवाजी कर्डिले, अरुण जगताप आणि भानुदास कोतकरांनी हजारो कोटींच्या मालमत्ता हडप केल्या. डॉक्टरांसारख्या प्रतिष्ठित लोकांनाही दिवसाढवळ्या पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांची संपत्ती हडप केली आहे तर इतरांचे काय, असा सवालही परिपत्रकात विचारला आहे.

शिवाजी कर्डिले यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असूनही ते पक्षाचे आमदार आहेत. जर राहुरी मतदारसंघातून कर्डिले यांनी उमेदवारी दिली तर मुंबईत पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन मतदारांना करु, असा इशाराही या समाजसेवकांनी दिला.