उल्हासनगर : शरद पवारांची अवस्था सध्या शोले चित्रपटातल्या जेलरसारखी झाल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. उल्हासनगरमध्ये महायुतीचे उमेदवार कुमार आयलानी यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.


यंदाच्या निवडणुकीत कुणी प्रतिस्पर्धीच नसल्यानं निवडणुकीला मजा येत नाहीये. एकीकडे राहुल गांधी बँकॉकला निघून गेलेत, तर शरद पवारांची अवस्था आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पिछे आओ, अशी झाली असून त्यांच्यासोबत कुणीच नसल्याची बोचरी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. विरोधकांच्या जाहिरनाम्याचीही त्यांनी खिल्ली उडवली.

विरोधकांनी जाहिरनाम्यात इतकी आश्वासनं दिली आहेत, की ते पाहून महाराष्ट्रात प्रत्येकाला ताजमहाल बांधून देऊ, महाराष्ट्रात प्रत्येकाला चंद्रावर नेऊ, अशीही आश्वासनं उद्या देतील, असा टोला त्यांनी लगावला. यावेळी उल्हासनगरात अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला असून वाढीव एफएसआय देऊन ही बांधकामं नियमित करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं. तसंच येत्या काळात उल्हासनगरात मेट्रो आणून मेट्रो स्टेशनला सिंधूनगर नाव देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. यावेळी भाजपच्या जाहीरनाम्याचं प्रकाशनही करण्यात आलं.

मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन आम्हाला ऐनवेळी दगा दिला : ज्योती कलानी
आम्ही उल्हासनगरात भाजपला मदत केली, त्यावेळी आम्हाला आमदारकीचं आश्वासन देण्यात आलं होतं. पण मुख्यमंत्र्यांनी आम्हाला ऐनवेळी दगा दिला, अशा शब्दात उल्हासनगरच्या आमदार ज्योती कलानी यांनी नाराजी व्यक्त केली होती.  उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत कलानी परिवाराने भाजपची मदत केल्यामुळे शहरात भाजपची सत्ता आली. त्यावेळी आमच्या कौटुंबिक अडचणी होत्या, त्यामुळे आम्ही मदत केली. मात्र आमदारकी तुम्हालाच देऊ, असं आश्वासन त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. त्यानुसार विद्यमान महापौर पंचम ओमी कलानी यांचं नाव निश्चितही झालं होतं. मात्र शेवटच्या क्षणी आम्हाला डावलून दुसऱ्याला उमेदवारी देण्यात आली. त्यामुळं आमच्यावर अन्याय झाला असून मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दगा दिल्याची भावना ज्योती कलानी यांनी व्यक्त केल्या होत्या. ज्योती कलानी या राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार असून यंदा सुनेला किंवा मुलाला भाजपकडून तिकीट मिळण्याची खात्री असल्यानं त्यांनी राष्ट्रवादीचा राजीनामाही दिला होता. मात्र भाजपनं दगा दिल्याने आपण पुन्हा राष्ट्रवादीतून उमेदवारी घेतल्याचं ज्योती कलानी यांनी स्पष्ट केलं.

उल्हासनगरचे सलग चार वेळा आमदार राहिलेले आणि सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले पप्पू कलानी यांच्या ज्योती कलानी या पत्नी आहेत. पप्पू कलानी यांना शिक्षा झाल्यानंतर ज्योती कलानी राष्ट्रवादीतर्फे उल्हासनगरमधून निवडून आल्या होत्या. मात्र नंतर त्यांचे पुत्र ओमी कलानी यांनी महापालिकेत भाजपशी घरोबा केला. ओमी हे भाजपतर्फे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठीही इच्छुक होते. मात्र शेवटच्या क्षणी आम्हाला डावलून कलानींचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जाणारे कुमार आयलानी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.