आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. त्यांच्यासाठी त्यांनी मुंबईत काल (10 ऑक्टोबर) दोन आणि आज (11 ऑक्टोबर) तीन जंगी सभा घेतल्या. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, सर्व मंत्र्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याची माझी हिंमत आहे. ईडीच्या कितीही चौकशा लावल्या तरी मी त्याला घाबरत नाही. काँग्रेस राष्ट्रवादीमधले भ्रष्टाचारी नेते भाजप आणि शिवसेनेत गेले आहेत. त्यांना कोणीच जाब विचारत नाहीत. मात्र माझी ईडीकडून चौकशी केली जाते. अशा चौकशांना राज ठाकरे घाबरत नाही.
सरकारला वठणीवर आणण्यासाठी मनसेला मत द्या, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. काल गोरेगाव आणि सांताक्रुझमध्ये सभा घेतल्यानंतर राज ठाकरेंनी भांडुपमधल्या उमेदवारांसाठी सभा घेतली. राज यांनी सांगितले की, मनसेच्या आंदोलनामुळे राज्यातले 78 टोल बंद झाले. तर मनसेमुळं मोबाईलमध्ये मराठी भाषा सुरु झाली.
राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात तीन भाषा आहेत. मी चौथी भाषा इथे येऊ देणार नाही, तसा प्रयत्न कोणी केल्यास त्याला बांबू बसतील. दरम्यान भाजपच्या काळात राज्य सरकारचं अडीच लाख कोटींचं कर्ज वाढलं आहे, असा आरोप मनसेने केला. कलम 370 वर बोलणारे अमित शाह शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर चकार का काढत नाहीत? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.