सांगली : जे नेते सांगली लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते ते आता कुठे आहेत? ते पळवाटा का काढत आहेत? असा सवाल करत काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी काँग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि इच्छुक उमेदवार प्रतीक पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. हिंमत असेल तर प्रतीक पाटलांनी निवडणूक लढवावी, असे आव्हान देत स्वतःच्या भावाने त्यांना निष्क्रिय ठरवले आहे, असा टोलाही विश्ववजीत कदमांनी लगावला आहे. कदम आज सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते.


सांगली लोकसभेच्या जागेवरून गेल्या महिन्यापासून सांगली काँग्रेसमध्ये सुप्तसंघर्ष सुरू आहे. वसंतदादा पाटील घराणे विरोधात पतंगराव कदम घराण्यातला हा संघर्ष आज उफाळून आला. काँग्रेस आमदार व माजी मंत्री पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजित कदम यांनी वसंतदादा घराण्यातील माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील आणि विशाल पाटील यांच्यावर सांगली लोकसभा उमेदवारी नाकारल्यावरुन निशाणा साधला आहे.

लोकसभेसाठी इच्छुक असणारे आज कुठे आहेत? ते आता पळवाट का काढत आहेत? असा सवाल आमदार विश्वजीत कदम यांनी उपस्थित केला आहे. सांगलीत विश्वजीत कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतीक पाटील आणि विशाल पाटील यांच्या भूमिकेवरही टीका केली आहे.

विश्वजीत कदम म्हणाले की, "गेली 35 वर्ष ज्यांच्या घरात सांगलीची खासदारकी होती, ते आता तिकीट घेण्यापासून लांब का पळत आहेत? लोकसभेचे तिकीट आपल्या घरातच राहावे यासाठी या लोकांनी काय प्रयत्न केले? असा सवाल उपस्थित करत विश्वजित कदम यांनी काँग्रेसचे विशाल पाटील यांच्यावरही जोरदार टीका केली.

संबधित बातमी :  सांगलीची जागा स्वाभिमानीला दिल्यास पक्ष कार्यालयाला टाळे ठोकू, काँग्रेस कार्यकर्त्यांचा पक्षश्रेष्ठींना दणका

कदम म्हणाले की, "आम्हाला लोकसभेचे तिकीट मिळले नाही, तर दुसऱ्या कोणालाच ते मिळू नये, ही विशाल पाटलांची भूमिका योग्य नाही. सांगली लोकसभेची काँग्रेसची जागा कोणत्याही पक्षाला जाणार नाही, ही जागा काँग्रेसकडेच राहील यासाठी आमचा प्रयत्न राहील. हायकामांड जो उमेदवार देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न राहील, असेही कदम यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, सांगली लोकसभेची जागा स्वाभिमानीला द्यायची की नाही यावर अद्याप निर्णय झालेला नाही. परंतु खासदार राजू शेट्टींसोबत आघाडी करून ही निवडणूक लढणार असल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले आहे.