मुंबई :  आघाडीची ज्यावेळी चर्चा करतो, त्यावेळी मोकळेपणाने करायला हवी. आघाडीतील मित्र मोकळेपणाने बोलत नाहीत आणि आपल्यातील लोकही स्पष्टपणे बोलत नाहीत. आपण सक्षम असताना दुसऱ्याच्या मागे फरफटत जातो हे चुकीचं आहे. या काळात काँग्रेसने आपल्या पाठीशी ज्या ताकतीने उभं राहायला हवं होतं, ते चित्र दिसलं नाही, याचं शल्य मनात आहे, अशी खंत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. ते एबीपी माझाच्या 'तोंडी परीक्षा' कार्यक्रमात बोलत होते.

माझ्या वडिलांच्या निधनानंतर स्थिती बदलली होती. आम्ही टोकाचा संघर्ष कधी केला नाही. परंतु यावेळी शरद पवारांनी पुन्हा 1991 च्या निवडणुकीवर घेऊन जाण्याचा यावेळी प्रयत्न केला. राष्ट्रीय स्तरावरील नेत्याने एवढी अपरिपक्वता दाखविल्याचं दुःख होतं, असंही विखे पाटील यावेळी म्हणाले. त्यांनी व्यक्तिगत पातळीवर यायला नको होतं. आता ही लढाई व्यक्तिगत पातळीवर गेली आहे.

याच कारणांमुळे मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की मी प्रचाराला जाणार नाही. या सगळ्या प्रकरणात पक्ष नेतृत्वाने हस्तक्षेप करायला पाहिजे होता, ही माझी अपेक्षा होती. अशा वेळी पक्षाची भूमिका पक्षनेत्याच्या मागे उभं राहावं, अशी असायला हवी, मात्र तसं  झालं नाही, अशी खंतही विखे पाटील यांनी व्यक्त झाली.

राजकारणात आपलं कोण आणि परकं कोण हे पदोपदी लक्षात येतं. आपल्याबरोबर फिरणारा आपला नसतो, ही स्थिती राजकारणात असते. आपल्या जवळच्या अशा लोकांपासून सावध राहणेच योग्य आहे, असेही ते म्हणाले.




या सर्व प्रकरणानंतर कॉंग्रेसमधील बहुतांश लोकांनी माझं समर्थन केलं आहे, अनेकांनी आमच्यावर अन्याय झाल्याचं सांगितलं, याचं समाधान आहे, असेही ते म्हणाले.


सुजय सगळ्यांचे पानिपत करायला समर्थ, मला धनुष्य उचलावे लागणार नाही

अहमदनगर दक्षिणमध्ये सुजय विखे नक्की जिंकणार आहेत. सुजय सगळ्यांचे पानिपत करायला समर्थ आहे. मला धनुष्य उचलावे लागणार नाही. सध्या माझी भूमिका सध्या वडिलांची आहे आणि वडील म्हणून माझा विश्वास आहे की, तो नक्की निवडून येईल, असा विश्वास राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. आपण पक्षाने दलेली जबाबदारी इमानदारीने पार पाडली आहे. सुजयच्या बाबतीत निर्णय करण्याचा प्रश्न आला त्यावेळी पक्षांतर्गत काही गोष्टी घडल्या, ज्यावर मी बोलू इच्छित नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.


सुजयसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, सुजयचा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय योग्य होता. सुजयने काम केलं आहे. त्याचा लोकसंग्रह आहे. सुजय माझा मुलगा आहे, म्हणून मी उमेदवारी मागत नव्हतो. त्याच्याकडे इलेक्टिव्ह मेरिट आहे, म्हणून त्याला आघाडीकडून उमेदवारी मिळणे आवश्यक होते, असे विखे पाटील यावेळी म्हणाले.

अहमदनगरची जागेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा 3 वेळा पराभव झाला आहे. त्यामुळं ही जागा काँग्रेसला द्यावी अशी मागणी होती, परंतु असं घडलं नाही, असेही ते म्हणाले.  औरंगाबाद जागेची अदलाबदल झाली असती, असेही म्हणाले. सुजय करता मी मागणी करणं चुकीचं ठरलं असतं. रावेरची जागा सोडली, औरंगाबादमध्ये अजूनही गोंधळाची स्थिती आहे.


अहमदनगरमध्ये समोरच्या पक्षाकडे सक्षम उमेदवारही नव्हता. राष्ट्रवादीने 9 ते 10 उमेदवार तपासून नकार दिला होता. अशा स्थितीत आपली एक जागा वाढावी असा विचार पक्षनेतृत्वाकडून होणे गरजेचे आहे, मात्र तसे झाले नाही, असेही ते म्हणाले.




आज सुजयचे आजोबा नाहीत नातवाचे लाड करायला




आज सुजयचे आजोबा नाहीत नातवाचे लाड करायला. सुजयलाही नातू म्हणून आश्वासन द्यायला हवं होतं, असा टोलाही त्यांनी यावेळी शरद पवार यांना लगावला. सुजयने राष्ट्रवादीत जावं यासाठी चर्चा झाली, मात्र पवारसाहेबांची तयारी नव्हती. ज्या पक्षाच्या नेत्याच्या मनात आपल्याबद्दल एवढा रोष आहे, तिथे जाऊन आत्महत्या करावी लागली असती, असेही विखे पाटील यावेळी म्हणाले. त्यामुळे सुजयचा भाजपात जाण्याचा निर्णय योग्यच होता. त्याला भाजपने सन्मानाने बोलावले. मुलगा पुढं जातोय याचं समाधान आहे, असेही ते म्हणाले.



15 दिवसात मोठा राजकीय निर्णय घेणार, राधाकृष्ण विखे पाटील यांचा खुलासा
काँग्रेसवर नाराज असलेले विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी 15 दिवसात मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. येत्या 15 दिवसात मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याचं राधाकृष्ण विखेंनी यावेळी जाहीर केलं आहे.  माझी भूमिका स्पष्ट आहे. मी गोंधललेलो नाही, उलट माझ्यामुळे अनेकजण गोंधळले आहेत. सुजयच्या तिकिटावरून निर्माण झालेला गोंधळ थांबविण्याचा मी प्रयत्न केला मात्र गोंधळ थांबवू शकलो नाही, असेही विखे पाटील यावेळी म्हणाले.मी एकच तत्व डोळ्यासमोर ठेवलं. वेळ हा सर्व गोष्टींवर उपाय आहे. माझी भूमिका नेहमी स्पष्ट राहिली आहे, असेही ते म्हणाले.  हा माझ्या दृष्टीने फार कठीण प्रश्न नव्हता, असेही ते म्हणाले. आपण पक्षाने दलेली जबाबदारी इमानदारीने पार पाडली आहे. सुजयच्या बाबतीत निर्णय करण्याचा प्रश्न आला त्यावेळी पक्षांतर्गत काही गोष्टी घडल्या, ज्यावर मी बोलू इच्छित नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.