चिखली विधानसभा मतदारसंघाची ओळख द्यायची झाली तर नागपूरनंतर विदर्भात प्रभावी केंद्र म्हणून चिखली ओळखली जाते. हे जरी खरं असल तरी भाजपचा या मतदारसंघात तीन वेळा विजय वगळता काँग्रेसचे वर्चस्व या मतदारसंघात बघायला मिळते. भाजपच्या अंतर्गत बंडाळीमुळे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे हे 2009 आणि 2014 निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय मिळवू शकले. यंदाही चिखली विधानसभेत भाजपच्या गटात उमेदवारांची मोठी यादी असली तरी फारशी वेगळी परिस्थिती दिसत नाही. अंतर्गत बंडाळीमुळे आमदार राहुल बोंद्रे यांच्या विजयाची हॅटट्रिक सुकर होईल की यंदा मोदीलाटेचा प्रभाव कामी येईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


भाजपची येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्ता स्थापनेकरिता हालचालींना वेग आल्याचं चित्र जरी असलं तरी चिखली विधानसभा निवडणुकीत मागील काळाचा विचार केला तर रेखाताई खेडेकर यांनी 1999, 2013 आणि 2009 या तीन वेळा विजय संपादन केला आहे. या विजयात संघाचा कुठलाच प्रभाव नसल्याचंही बोललं जात आहे. मात्र नुकत्याच मिळालेल्या लोकसभेच्या अभुतपूर्व यशामुळे असंख्य नेत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून भाजपमध्ये साहजिकच उमेदवारी मिळविण्याची स्पर्धा मोठी आहे. हेच भाजपच्या पथ्यावर पडणार का? आणि त्याला कारणही तसंच आहे. ते म्हणजे मागील निवडणुकीचा इतिहास.

चिखली विधानसभा मतदारसंघात विकासात्मक मुद्यांवर बोलायचं झालं तर अनेक समस्या अजूनही कायम आहेत. त्यात प्रामुख्याने एक लाख लोकसंख्या असलेल्या चिखली शहरातील पाण्याचा प्रश्न कायम आहे. ही समस्या जरी नगरपालिका हद्दीतील असली तरीही लोकप्रतिनिधी या नात्याने महत्वाची ठरते. चिखलीत 1992 ला एमआयडीसीची स्थापना झाली. या ठिकाणी गोडाऊन वगळता एकही मोठा उद्योग उभारला गेला नाही. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न कायम आहे. चिखली हे धान्याचे मोठे बाजारकेंद्र होते. दळणवळणाचे मोठे साधन रेल्वे नसल्याने येथील बाजारपेठ बंद पडल्यासारख्या अवस्थेत आहे. सोबतच  उपजिल्हा रुग्णालयाची मागणी अजूनही प्रतीक्षेत आहे. ग्रामीण भागातील अनेक गावात पाण्याचा प्रश्न कायम आहे.

चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून गेल्या दोन वेळेस विजय संपादन करणार्‍या आमदार राहुल बोंद्रे यांची उमेदवारी निश्चित समजली जात असली तरी दुसरीकडे भाजपातील इच्छुकांमधील रस्सीखेच असल्यामुळे उमेदवार निवडीची प्रक्रिया पक्षश्रेष्ठींकरिता डोकेदुखीची ठरणार आहे. विविध विकासकामांना प्राधान्य देण्याऐवजी जातीय समीकरणांभोवतीच ही निवडणूक लढविली गेली नाही तरच नवल.

मागील निवडणुकीत दुसर्‍या क्रमांकावर राहिलेले सुरेश  खबुतरे सुद्धा यावेळी इच्छुक आहेत. तर  इच्छुकांच्या रांगेत असलेले संजय चेके पाटील, अ‍ॅड.विजय कोठारी,  पालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळविणारे नगराध्यक्ष पती कुणाल बोंद्रे,  श्वेता महाले यांच्यासह भाजपचा मित्रपक्ष म्हणून सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेही यावेळी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालविले आहेत. हा मतदारसंघ शिवसेनेला सोडवून घेण्याचे प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेकडूनसुद्धा काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेले प्रा.नरेंद्र खेडेकर यांच्यासह माजी जिल्हा प्रमुख तथा जिल्हा सहसंपर्क प्रमुख असलेले भास्करराव मोरे सुद्धा विधानसभा लढविण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहेत. सोबतच वंचित आघाडी हे काय वेगळा चमत्कार घडवून आणेलं हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

2009 च्या निवडणुकीत 76,465 मतं घेवून आमदार राहुल बोंद्रेंनी भाजपच्या ह.भ.प.प्रकाशबुवा जवंजाळ यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेतसुद्धा 61,581 मते घेत राहुल बोंद्रे यांनी भाजपच्या सुरेश खबुतरे यांचा पराभव करून दुसर्‍यांदा आमदारपदी विराजमान झाले होते. हे झालं आतापर्यंतच मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेचे उमेदवार प्रतावराव जाधव यांना चिखली विधानसभेत 23 हजारांच्या वर लीड मिळाला आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार राहुल बोंद्रे यांचा विजय रथ थांबणार का ? हे पाहणे महत्वाचे राहणार आहे.
जाणून घ्या या मतदारसंघाविषयी