माहितीनुसार, हभप किशोर महाराज जाधव यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरून भाजपा उमेदवार अभिमन्यू पवार यांच्या बाबत काही पोस्ट केल्यामुळे अपक्ष उमेदवार बजरंग जाधव यांना राग आला. त्यांनी किशोर जाधव यांचे अपहरण करून निलंगा येथे नेण्यात आले. तिथे बजरंग जाधव आणि अरविंद पाटील यांनी आमचा प्रचार कर, आम्हाला पाठिंबा दे असे सांगत मारहाण केली. अशी फिर्याद किशोर जाधव यांनी दिली आहे. यावरून औसा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
किशोर जाधव यांनी तक्रारीत म्हटले आहे की, माझे अपहरण करुन मला मारहाण करण्यात आली. तसेच अरविंद पाटील यांनी माझा मोबाईल काढून घेत माझ्या फेसबुकवरुन सर्व पोस्ट देखील डिलीट केल्या असल्याचे जाधव यांनी तक्रारीत म्हटले आहे.
लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघातील निवडणूक ही प्रथम पासूनच गाजत आहे. भाजपाचे उमेदवार अभिमन्यू पवार यांच्या विरोधात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर गटाने बंडखोरी करत बजरंग जाधव यांनी उमेदवारी दाखल केली आहे. या उमेदवाराच्या मागे अरविंद पाटील यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.