वर्धा : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बालाकोट एअर स्ट्राईकचे श्रेय घेतल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना आव्हान दिले आहे की, एअर स्ट्राईकचे श्रेय घेणाऱ्या मोदींनी केवळ पाच मिनिटे रायफल घेऊन जम्मू-काश्मीरमध्ये एकट्याने बसने प्रवास करुन दाखवावा.


भारतीय वायु सेनेने पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राईक करुन जगाला स्वतःचे शौर्य दाखवले. परंतु पंतप्रधान मोदींनी त्याचे श्रेय घेतले. परंतु हेच मोदी रायफल तरी उचलू शकतात का? सीआरपीएफच्या जवानांप्रमाणे रायफल घेऊन बसने प्रवास करु शकतात का? असे सवाल राहुल यांनी विचारले आहेत.

राहुल म्हणाले की,'चौकीदार' मोदींनी केवळ एक काम केले आहे. त्यांनी त्यांचे 'बॉस' उद्योगपती अनिल अंबानीला राफेल या लढाऊ विमानाच्या व्यवहारात सामावून घेतले आहे.

राहुल भाजपवर आरोप करत म्हणाले की, "कांग्रेस लोकांना जोडण्याचा प्रयत्न करतो, तर भारतीय जनता पार्टी लोकांना तोडण्याचे काम करते."