गोवा: माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पणजी विधानसभेच्या 19 मे रोजी होणार्‍या पोटनिवडणुकीचा जाहीर प्रचार शुक्रवारी संपुष्टात येणार आहे. उमेदवारांकडून आता घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेण्यावर भर दिला जाणार आहे. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पणजीत सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


गुरुवारी मध्यरात्री भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्या कारवर दुचाकीवरुन आलेल्या युवकांनी बियरच्या बॉटल मारुन हल्ला केला.या घटनेमुळे पणजीत तणाव निर्माण झाला आहे. कुंकळ्येकर यांनी पणजी पोलिसात तक्रार दाखल करुन  हल्लेखोरांना त्वरित गजाआड करण्याची मागणी केली आहे. आपल्या प्रचारासाठी पार पडलेल्या नितिन गडकरी यांच्या सभेला मिळालेला प्रतिसाद पाहुन विरोधक बिथरले आहेत. त्यातूनच हा प्रकार घडला असावा,असा संशय भाजपने व्यक्त केला आहे. पणजी पोटनिवडणुकीच्या रिंगणात दोन अपक्षांसह सहा उमेदवार उतरले आहेत. मात्र, खरी लढत ही काँग्रेस उमेदवार बाबूश मोन्सेरात, भाजप उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर व गोवा सुरक्षा मंचचे उमेदवार सुभाष वेलिंगकर यांच्यात होणार आहे.

निवडणुकीच्या प्रचारापासून दिलीप घाडी व विजय मोरे हे दोन अपक्ष उमेदवार जवळपास अलिप्त असल्याचे दिसून आले आहे. काँग्रेस, भाजप, गोवा सुरक्षा मंच तसेच आम आदमी पक्षाने कोपरा बैठकांचा धडाका लावण्यात आला आहे. पणजी पोटनिवडणुकीच्या प्रचारात भाजपच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उडी घेतली असून त्यांनी बोक द व्हाक येथे उमेदवार सिद्धार्थ कंकळ्येकर यांच्यासाठी गुरुवारी जाहीर सभा घेतली, काँग्रेससाठी मात्र स्थानिक नेत्यांनीच प्रचारात भाग घेतला.

पणजीचे आमदार तथा तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे 17 मार्च रोजी आजारपणामुळे निधन झाले. त्यामुळे पणजीची जागा रिक्त बनली असून 19 मे रोजी पोटनिवडणूक होईल तर 23 मे रोजी म्हणजेच लोकसभा तसेच गोवा विधानसभेच्या म्हापसा, मांद्रे व शिरोडा या तीन मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांच्या मतमोजणी सोबतच पणजी पोटनिवडणुकीसाठीही मतमोजणी होईल.

पणजी मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात असून गेली 25 वर्षे पर्रीकर येथील आमदार होते. त्यामुळे पणजी काबीज करण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसकडून पणजीवर झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच सरकारच्या धोरणांविरोधात वेळावेळी आवाज उठवणारे गोवा सुरक्षा मंच, आम आदमी पक्षानेदेखील आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवून स्पर्धेत रंगत आणली आहे.