मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असल्याने भाजपकडून शुक्रवारी पहिली उमेदवारी यादी (BJP Candidate list) जाहीर होण्याची शक्यता आहे. या उमेदवारी यादीत 100 उमेदवारांचा समावेश असण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक झाली होती. या बैठकीत भाजपच्या 100 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जाते.


भाजपच्या पहिल्या उमेदवारी यादीतील 100 उमेदवारांची नावे निश्चित करताना गेल्या पाच वर्षांमधील त्यांची कामगिरी हा प्रमुख निकष होता. याशिवाय, संबंधित उमेदवार सोशल मीडियातून लोकांपर्यंत कसा पोहोचला, ही गोष्टही ध्यानात घेण्यात आली. अनेक विद्यमान आमदारांच्या कामगिरीवर पक्ष नाराज आहे. त्यांच्याऐवजी संबंधित मतदारसंघात नव्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपच्या पहिल्या उमेदवारी यादीत कोणाला स्थान मिळणार आणि कोणत्या आमदारांना डच्चू मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 


सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपचे मुंबईतील पाच आमदार खराब कामगिरीमुळे रेड झोनमध्ये असल्याची चर्चा आहे. यामध्ये राम कदम, भारती लव्हेकर, सुनील राणे, पराग शाह आणि तामिल सेल्वन यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आजच्या यादीत या पाच आमदारांचा समावेश असणार की नाही, हे पाहावे लागेल.


महाराष्ट्र भाजपकडून केंद्रीय नेतृत्त्वाकडे 115 आमदारांची लिस्ट


महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाकडून केंद्रीय भाजपला सुमारे 115 नावांची यादी सादर करण्यात आल्याची माहिती आहे. या 115 जागांमध्ये भाजपच्या सीटिंग आमदार आणि भाजप समर्थक अपक्ष आमदार अशा मतदारसंघांचा समावेश आहे.


या 115 मतदार संघात संदर्भात प्रदेश भाजपने नव्या नावांची केंद्रीय नेतृत्त्वाकडे शिफारस केल्याचे समजते. आता या 115 मतदार संघाच्या यादीमध्ये किती नवीन चेहरे राहतील किती जुन्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल याचा निर्णय केंद्रीय पक्ष नेतृत्व करेल. त्यासंदर्भात आज दिल्लीत बैठक होण्याची शक्यता आहेत. त्यामुळे भाजपची विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. 


महायुतीच्या जागावाटपाचा नवा फॉर्म्युला ठरला?


महायुतीच्या गोटातून आलेल्या माहितीनुसार भाजप आता किंचित माघार घेऊन 140 ते 150 जागा लढण्याच्या तयारीत आहे. तर शिंदे गट 80 ते 87 जागा लढवण्याच्या तयारीत आहे. यानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला 60 ते 65 जागा लढणार येऊ शकतात. तर 20 ते 25 जागांवर अजूनही चर्चा सुरु असल्याचे समजते. उरलेल्या जागांचा तिढा सोडवण्यासाटी महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते आज दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.


आणखी वाचा


शेवट गोड करण्यासाठी सगळ्यांचा अट्टाहास; 'शिवाजी पार्क'वर सभेसाठी एकाच दिवशी 4 पक्षांनी ठोकला शड्डू


भाजपची 'किंचित' माघार, चंदीगढमध्ये एकनाथ शिंदे मोदींना भेटले, महायुतीच्या जागावाटपाचा नवा फॉर्म्युला ठरला?