मुंबई : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला पराभवाचा धक्का बसल्यानंतर महाराष्ट्रातही राजकीय भूकंप येण्याची चिन्हं आहेत. भाजपचे खान्देशातील मोठे नेते काँग्रेस-राष्ट्रवादीत घरवापसी करण्याची चिन्हं आहेत. शिवसेनेचा नेताही


मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभेच्या निकालानंतर भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. याचाच परिणाम म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले काही नेते घरवापसी करण्याची शक्यता आहे.

भाजपमध्ये गेलेल्या आणि भाजपमध्ये असलेल्या नेत्यांची पक्ष बदलण्याची चाचपणी गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. भाजपविरोधातील जनमत, पक्षात होणारी घुसमट अशा अनेक कारणांमुळे काही नेते आणि खासदार पक्ष बदलण्याचे संकेत आहेत. भाजपचा खान्देशातील मोठा नेता पक्षाला रामराम करण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, शिवसेनेचा मराठवाड्यातील मोठा नेताही लोकसभा निवडणुकीत वेगळा विचार करण्याची शक्यता आहे. भाजप नेत्याला उत्तर देण्यासाठी पक्ष बदलून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. गेले काही दिवस या नेत्यांनी केलेल्या चाचपणीनंतर हे तर्क लढवले जात आहेत.

मध्य प्रदेशात भाजपने काँग्रेसला कडवी झुंज दिली, मात्र काँग्रेसला 114 जागा मिळाल्यामुळे सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला. छत्तीसगडमध्ये भाजपचा सुपडासाफ झाला, तर राजस्थानातही भाजपचं सरकार खालसा झालं.