5 crore seized : पुण्यातील खेड शिवापुर टोल नाक्यावर काल(सोमवारी) पुणे ग्रामीण पोलिसांनी 5 कोटी रूपयांची रक्कम पकडली होती. जप्त करण्यात आलेली पाच कोटी रक्कमची कोणाची होते, कुठुन आले होते आणि कुठे निघाले होते यांबाबतची मोठी माहिती समोर आली आहे. पुणे जिल्ह्याचे एसपी पंकज देशमुख यांनी याप्रकरणी मोठी माहिती दिली आहे.यावेळी बोलताना ते म्हणाले, खेड शिवापूर टोलनाक्याजवळ नाकाबंदीमध्ये पकडली ती कार पकडली. आयकर विभाग, निवडणूक आयोग यांच्यासोबत मिळून कारवाई करण्यात आली आहे. 


गाडीत सापडलेली रक्कम 5 कोटी रुपये आहेत. याबाबतची माहिती मिळाली होती, त्यानंतर नाकाबंदीमध्ये गाडी सापडली आहे. पैसे आयकर विभागाकडे दिले आहेत.सर्व पैसे तपासून घेतले आहेत, ते फेक नाहीयेत. ज्यांच्याकडे पैसे सापडले ते सांगतायत आम्ही व्यावसायिक आहोत. (रोड बांधकाम व्यावसायिक आहेत) हे पैसे आमचेच आहेत. पैसे कोठून आले आणि कुठे नेले जात होते याबाबत तपास सुरु आहे.मुंबईवरून कोल्हापूरला चालल्याची प्राथमिक माहिती आहे. ठेकेदार म्हणत आहे ते पैसे माझे आहे. त्याने तसा जबाब आयकर विभागाला दिला आहे. राजकीय काही कनेक्शन आहे का याबाबत अधिकचा तपास सुरू आहे. 


पैसे सापडलेल्या गाडीचा नंबर MH 45 AS 2526 आहे. ही गाडी आर.टीओकडील नोंदीनुसार अमोल नलावडे यांच्या मालकीची आहे. मात्र, अमोल नलावडे यांनी ही गाडी आपण बाळासाहेब आसबे नावाच्या व्यक्तीला विकल्याचा दावा केला आहे. या रकमेसह गाडीमध्ये जे चार जण होते. त्यांना चौकशी करुन सोडून देण्यात आलं आहे आणि या रकमेचे तपशील इन्कम टॅक्स विभागाकडे जमा करण्यास सांगण्यात आला आहे. मात्र, पोलीस आणि निवडणूक विभागाचे अधिकारी याबाबत अधिकृतपणे माहिती का देत नाहीत हा प्रश्न विचारला जातो आहे. तर या प्रकरणात आता राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 


संजय राऊतांची प्रतिक्रिया


पुण्यात खेड-शिवापूर टोल नाक्यावर गाडीत 5 कोटी पकडल्यानंतर आता संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह महायुतीवर आरोप केले आहेत. राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले, पुण्यात खेड-शिवापूर टोल नाक्यावर काल दोन गाडया पकडल्या. त्यात जवळपास 15 कोटी रुपये होते. मी बोललो होतो, एकनाथ शिंदे आपल्या माणसांना 50-50 कोटी पुन्हा देणार आहेत. 15 कोटीचा पहिला हप्ता जात होता. त्यात सांगोल्याचे गद्दार आमदार त्यांचे 15 कोटी जात होते. 5 कोटीचा हिशोब लागला. 10 कोटी सोडले. फोन आल्यावर एक गाडी सोडली. 5 कोटी आमच्या लोकांनी पकडून दिले. 150 आमदारांना 15-15 कोटी पोहोचले आहेत. उरलेले पैसे सुद्धा मिळतील”, असंही यावेळी बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 


शहाजीबापू पाटलांची प्रतिक्रिया


पैसे पकडलेली कार ही सांगोल्यातील असल्याने या पैशांचा संबध शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटलांशी जोडला जातो आहे. त्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहेत, याबाबच एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना शहाजीबापू म्हणाले, त्या पैशाची अथवा गाडीशी माझा कसलाही संबंध नाही. संजय राऊत हे नेहमीच वाटेल ते बोलत असतात त्यांना झोपताना झाडी आणि उठताना डोंगर दिसतो. या गाडीत असणारे कार्यकर्ते हे माझ्या संबंधातली असले तरी त्यांचे व्यवसाय उद्योग वेगवेगळ्या आहेत आणि काल झालेल्या या प्रकारानंतर माझ कोणाचाही संपर्क झालेला नाही. ही गाडी सांगोल्याची असल्याने लगेच मला टार्गेट करायचा प्रयत्न करण्यात आला आहे. या पैशाची अथवा गाडीशी माझा कोणताही संबंध नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.