जालना जिल्ह्यात निवडणूक काळात सर्वाधिक चर्चेचा विषय असतो ते भोकरदन विधासभा मतदार संघाचा. केंद्रीय राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांच्या प्रभावाखाली असलेल्या या मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष असते. भोकरदन आणि जाफराबाद या दोन तालुक्यांचा समावेश असलेल्या या विधानसभा क्षेत्रात 90 टक्के शेती व्यवसायावर आधारीत असलेला मोठा  ग्रामीण मतदार आहे. याच ग्रामीण भागात ग्रामपंचायत सदस्यांपासून केंद्रीय राज्यमंत्री पदापर्यंतच्या प्रवासात रावसाहेब दानवे यांनी आपला प्रभाव कायम ठेवलाय. भोकरदन मतदारसंघात आणि राज्याच्या राजकारणात 40 वर्ष राबलेल्या दानवेंचा संघर्ष हाच या मतदारसंघाचा इतिहास झाला आहे.


*भोकरदन विधानसभा मतदारसंघातील मतदारसंख्या*

*महिला मतदार संख्या: 1 लाख 42 हजार 961

*पुरुष मतदार संख्या: 1 लाख 58 हजार 885

*एकुण मतदार संख्या: 3 लाख 1 हजार 846

स्वतंत्र जालना जिल्हा निर्मिती होण्याअगोदर भोकरदन तालुका औरंगाबाद जिल्ह्यात होता. भाजपचे बहुमत नसताना काँग्रेसच्या दोन सदस्यांच्या पाठिंब्यावर पंचायत समितीच्या सभापतीची खुर्ची बळकावून रावसाहेब दानवे यांनी या भागाला आपल्या राजकारणाची चुणुक दाखवली होती. पुढे 1985 साली पहिल्यांदा भोकरदन विधानसभेची रावसाहेब दानवे यांनी निवडणूक लढवली. यात काँग्रेसचे संतोष दसपुते यांच्याकडून त्यांचा 1 हजार 568 मतांनी पराभव झाला. मात्र अत्यल्प मतांनी झालेल्या पराभवाने ते मतदारसंघात चर्चेत आले. पुढे 1990 मध्ये काँग्रेसचे त्यावेळचे प्रमुख नेते रंगनाथ पाटील यांचा त्यांनी 25 हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला आणि तेव्हापासून दानवे यांच्या याच विजयाचा अश्वमेघ अद्यापपर्यंत कोणाला रोखता आला नाही. पुढे 1995 साली ते पुन्हा विधानसभेवर निवडून आले. यानंतर 1999 पासून सलग पाच वेळा ते लोकसभेवर निवडून आले.

2019 लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली मते

रावसाहेब दानवे (भाजप)- 698019

विलास औताडे (काँग्रेस)- 365204

शरद वानखेडे (वंचित बहुजन आघाडी)- 77158

भोकरदन विधासभा क्षेत्रात 2003 साली रावसाहेब दानवे यांच्या प्रभावाला पहिला धक्का बसला. 2003 साली त्यावेळी भोकरदन मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या विठ्ठलराव सपकाळ यांच्या निधनानंतर पोटनुवडणूक लागली होती. या निवडणुकीत भाजपचे माजी खासदार पुंडलिकराव दानवे यांचे पुत्र चंद्रकांत दानवे हे राष्ट्रवादीकडून उभे राहिले आणि निवडून आले. खरंतर ही लढत अप्रत्यक्षपणे चंद्रकांत दानवे यांचे वडील माजी खासदार पुंडलिकराव दानवे आणि रावसाहेब दानवे यांच्यात होती. तेंव्हापासूनच दोन्ही दानवे राजकीयदृष्ट्या एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले.

चंद्रकांत दानवे यांनी पुढे 12 वर्ष भोकरदन मतदारसंघात आपले वर्चस्व गाजवले. मधल्या काळात म्हणजेच 2009 साली रावसाहेब दानवे यांनी आपल्या पत्नी निर्मला दानवे यांना विधासभेच्या रिंगणात उतरवले यावेळी भाजपकडून निर्मला दानवे आणि राष्ट्रवादीकडून चंद्रकांत दानवे असा सामना झाला. यात निर्मला दानवे यांचा 1 हजार 639 मतांनी पराभव करून राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे यांनी हा गड आपल्याच ताब्यात ठेवत रावसाहेब दानवेंच्या वर्चस्वाला हादरा दिला.

2014 मध्ये मात्र भोकरदन विधासभा मतदारसंघात रावसाहेब दानवे यांनी आपल्या मुलाला विधासभेच्या आखाड्यात उतरवण्याचा निर्णय घेतला. यावेळी खासदार रावसाहेव दानवे यांचे पुत्र संतोष दानवे विरुद्ध राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे असा सामना रंगला. या लढतीत भाजपचे उमेदवार संतोष दानवे यांचा 6 हजार 750 मतांनी विजय झाला. यावेळी विधालसभेचा गड आपल्याकडे खेचण्यात दानवे पिता पुत्राला यश आले.

2014 विधानसभा- उमेदवारांना मिळालेली मतं

संतोष दानवे  (भाजप)---69,597
चंद्रकांत दानवे (राष्ट्रवादी) 62,847
रमेश गव्हाड (शिवसेना)--36,298

2014 मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती नव्हती. याचा फायदा भाजपचे उमेदवार संतोष दानवे यांना झाला. संतोष दानवे यांच्या विरोधातील मतदार राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षात विभागले गेले. एकूण मतदानापैकी 35 टक्के मते संतोष दानवे यांना तर पराभूत उमेदवार राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे यांना 31 टक्के मते मिळाली होती. परंतु संतोष दानवे यांच्या विरोधातील शिवसेनेचे उमेदवार रमेश गव्हाड यांनी जवळपास 36 हजार म्हणजे 18.50 टक्के मते घेतली होती. त्यामुळेच संतोष दानवे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.

2014 नंतर सुरुवातीच्या काळात भाजपचे खासदार रावसाहेब दानवे आणि भोकरदन विधासभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पुढारी मंडळींमध्ये बेबनाव होता. हा बेबनाव अगदी 2019 च्या लोकसभा निवडणूक तोंडावर येईपर्यंत होता. परंतु लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप शिवसेनेची युती झाली. ही युती विधासभेत राहिली तर राष्ट्रवादीच्या विजयाचा मार्ग खरतड असेल. यावेळी राष्ट्रवादीकडून पुन्हा चंद्रकांत दानवे हेच उमेदवार असतील हे स्पष्ट आहे. चंद्रकांत दानवे यांची डोकेदुखी अलीकडच्या काळात आणखी वाढली आहे. याचे कारण म्हणजे राष्ट्रवादीच्या जाफराबाद तालुक्यातील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचा कोण उमेदवार भोकरदन मधून असेल याचा अंदाज सध्यातरी येत नाही. राष्ट्रवादीची काँग्रेस पक्षाशी आघाडी असेल परंतु काँग्रेसची क्षमता चंद्रकांत दानवेंना निवडून आणण्यास कितपत उपयोगी ठरेल या विषयी साशंकता आहे.

रावसाहेब दानवे सध्या भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार झालेले असले तरी त्यांच्याकडे केंद्रीय राज्यमंत्री पद आहे. निवडणुकीच्या राजकारणात तरबेज मानले जाणारे रावसाहेब दानवे यावेळेस ही आपले पुत्र संतोष दानवे यांच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील यात शंका नाही. दुसरीकडे रावसाहेब दानवे आणि त्यांचे पुत्र संतोष दानवे यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करत दानवे पिता पुत्राच्या एकाधिकारशाहीला राष्ट्रवादीच्या नेत्याकडून आवाहन दिले जातेय. या शिवाय अनेक वर्षे मतदार संघावर वर्चस्व गाजवणाऱ्या रावसाहेब दानवे यांच्याकडून सिंचन तसेच मूलभूत सोयी सुविधांचा मतदारसंघात विकास न झाल्याचा प्रचार राष्ट्रवादीकडून केला जातोय. दरम्यान मागील विधानसभा निवडणुकीत मोदी लाट असताना राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत दानवे यांचा निसटता पराभव झाला होता. त्यामुळे मागच्या निवडणुकीच्या आकड्यावरून येणारी विधानसभा आपल्यासाठी फार अवघड नसल्याचा प्रसार प्रचार देखील त्यांच्याकडून होत आहे.

भाजप -राष्ट्रवादीची बलस्थाने :-

भोकरदन विधासभा मतदारसंघ हा खासदार रावसाहेब दानवे यांचे गाव असलेला आणि त्यांच्या प्रभावाखालील मतदारसंघ मानला जातो. रामेश्वर सहकारी साखर कारखाना सुरुवातीपासून खासदार रावसाहेब दानवे यांच्या अधिपत्याखाली आहे. भोकरदन जाफराबाद या दोन्ही पंचायत समित्या भाजपच्या ताब्यात आहेत. तर भोकरदन नगरपरिषद ही काँग्रेसच्या ताब्यात आहे. गेल्या 5 वर्षात खासदार दानवे यांनी या विधानसभा मतदारसंघात रस्त्यांचे जाळे मोठ्या प्रमाणावर विणलेले आहे. साहाजिकच रस्त्यांच्या कामाचे मुद्दे पुढे करून भाजप मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने या विधासभा मतदारसंघात भाजपने  प्रत्येक मतदान केंद्रापर्यंत पक्षाची बांधणी केली आहे.

भाजपच्या तुलनेत राष्ट्रवादीची देखील गाव निहाय संघटनात्मक बांधणी असून सत्ताकाळाचा  12 वर्षाच्या अनुभवात ग्रामीण भागात कार्यकर्त्यांची फळी मजबूत आहे. दरम्यान रावसाहेब दानवे हे अनेक वर्षे सत्तेच्या मोठ्या पदावर राहून सुद्धा मतदारसंघात विकासाचा वेग त्यांना गाठता आला नाही. काही मूलभूत सुविधांसह औद्योगिक दृष्ट्या विकासापासून मतदारसंघ दूर असल्याचे चित्र राष्ट्रवादीकडून मतदारांच्या समोर उभे केले जाईल. भाजपइतक्या संस्था या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या ताब्यात नाहीत पण असे असले तरी आगामी विधासभा निवडणुकीत दोन्ही दानवेंमध्ये विधानसभेचा मोठा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे.