मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा उद्या म्हणजेच 24 ऑक्टोबर रोजी निकाल लागणार आहे, 21 ऑक्टोबर रोजी राज्यभरात एकाच टप्प्यात मतदान पार पडलं. संपूर्ण राज्यात एकूण 60.46 टक्के मतदानाची नोंद झाली आणि आता मतमोजणीकडे सर्वांचं लक्ष आता निकालाकडे लागलं आहे. राज्यात शिवसेना-भाजपची युती आहे आणि युतीच्या निकालाबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अंदाज व्यक्त केला आहे. शिवसेनेला 100 जागा मिळतील असा संजय राऊत म्हणाले.


निकालाबद्दल बोलताना संजय राऊत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल हा पुन्हा एकदा शिवसेना-भाजपच्या बाजूनेच लागणार आहे हे चित्र स्पष्ट होतं, फक्त प्रश्न हा होता की विरोधीपक्ष म्हणून कोणता पक्ष समोर उभा राहणार. मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार वंचित आघाडी विरोधीपक्ष म्हणून पुढे येईल.



शिवसेना आणि भाजपला एकमेकांशिवाय पर्याय नाही कारण भाजपने दोन-पाच जागा जिंकल्या तरीसुद्धा शिवसेनेशिवाय ते राज्य स्थापन करु शकणार नाहीत असं संजय राऊत म्हणाले. सोबतच शिवसेना 100 जागांवर विजय प्राप्त करेल, तर शिवसेना-भाजप युती 200 पार करेल असा अंदाज संजय राऊत यांनी व्यक्त केला.

शिवसेना-भाजपच्या युतीबाबत बोलताना युती निकालानंतर तुटणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलं. 2014 साली जरी युती तुटली असली तरी आम्ही युतीत परत आलो आणि सध्या आघाडी असेल किंवा शिवसेना-भाजप असेल सर्वांचीच स्थिती तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना अशी झाली आहे असं राऊत यांनी म्हटलं.