मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभेतूच लढणार असल्याची घोषणा शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी वरळीच्या शिवसैनिकांमध्ये केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. वरळीच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केल्याचं समोर येत आहे.


आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढणवणार असल्याचे चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढवणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. वरळीच्या शिवसैनिकांना तयारीला लागण्याचे आदेशच अनिल परब यांनी दिल्याचं समोर येत आहे.



अनिल परब यांच्या या घोषणेचं विद्यमान आमदार सुनिल शिंदे आणि सचिन अहिर यांनी स्वागत केलं आहे. आदित्य ठाकरे यांना वरळीतून एक लाख मतांपेक्षा जास्त मताधिक्याने जिंकून आणण्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.


शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्याला खासदार धैर्यशील माने, शिवसेना नेते अनिल परब, आमदार सुनिल शिंदे आणि माजी आमदार सचिन अहिर उपस्थित होते. आदित्य ठाकरे विधानसभेची निवडणूक लढले तर ठाकरे कुटुंबायातून निवडणूक लढलेले पहिले ते पहिले सदस्य असतील. त्यामुळे ते खरंच निवडणूक लढणार का? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.