मुंबई: शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. शुक्रवारी सकाळी 11 पर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेने मंजूर केला नव्हता. त्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाने हायकोर्टात धाव घेतली होती. न्यायालयाच्या या निर्णयाने ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. 


शिवसेना ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज हायकोर्टात तातडीने सुनावणी झाली. यावेळी ऋतुजा लटके यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटले की, ऋतुजा लटके यांनी राजीनामा 2 सप्टेंबर रोजी दिला. त्यानंतर 29 सप्टेंबर रोजी राजीनामा फेटाळण्यात आला. 3 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. आम्ही नियमांनुसार मुंबई महापालिकेकडे राजीनामा सुपूर्द केला. एक महिन्याचा नोटीस पिरियड पूर्ण करायचा नसेल तर एक महिन्यांचा पगार द्यावा लागेल असे सांगण्यात आले. एक महिन्याचा पगार कोषागरात जमा केला असल्याचे लटके यांच्या वकिलाने सांगितले.


ऋतुजा लटके या महापालिकेच्या सेवेत असून एखादा कर्मचारी राजीनामा देऊन निवडणूक लढवत असेल तर काय अडचण आहे असा सवाल न्यायालयाने पालिकेला विचारला. त्यावर सविस्तर उत्तर देण्याचे निर्देशही दिले. आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे आम्हाला हस्तक्षेप करावा लागत असल्याचं सांगत न्यायालयाने ऋतुजा लटके यांच्या बाजूने निकाल दिला. महापालिकेने ऋतुजा लटके यांच्या राजीनामा सकाळी 11 वाजेपर्यंत स्वीकारावा असा आदेशही न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. 


उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं अंधेरी पोटनिवडणुकीसाठी (Andheri East Bypoll 2022) ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण त्या महापालिकेच्या सेवेत होत्या, त्यांनी 3 ऑक्टोबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पण पालिकेने त्यांचा राजीनामा स्वीकारला नव्हता. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचं काय होणार याबद्दल संदिग्धता होती. 


ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर स्पष्टीकरण देताना पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी 30 दिवसात हा राजीनामा स्वीकारला जाईल असं स्पष्टीकरण दिलं होतं. त्यावर ऋतुजा लटके यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने ऋतुजा लटके यांच्या बाजूने निकाल देताना त्यांचा राजीनामा उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत स्वीकारावा असे निर्देश दिले.