पालघर : लोकसभेचे बिगुल तर वाजले, आचारसंहिताही लागू झाली मात्र पालघर लोकसभेकरता सर्वच पक्षाकडून कोणते उमेदवार आखाड्यात उतरवले जातात हे अजूनही गुलदस्त्यात असल्याने मतदारांमधेही संभ्रमाचे वातावरण आहे. एकीकडे भाजप-शिवसेना युती वरिष्ठ पातळीवरुन झाली. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हट्ट धरल्याप्रमाणे पालघरची जागा शिवसेनेला, असा उहापोह झाला आणि पालघर जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात नाराजीचे सूर उमटायला सुरुवात झाली. त्यातच काही पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामेही सादर केले.


शिवसेना-भाजप कार्यकर्ते एकमेकांना साथ देणार
असं असलं तरीही पालघर लोकसभेसाठी युतीकडून शिवसेनेलाच ही जागा सोडली असल्याचीच चर्चा मतदारांमधे आजही होताना दिसत आहे. भाजपाचे दिवंगत माजी खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वणगा हे या जागेसाठी उमेदवार असतील.



परंतु मागील पोटनिवडणुकीत भाजपाकडून निवडून आलेले खासदार राजेंद्र गावित हे या निर्णयावर नाराज आहे. त्यांनी मागील पोटनिवडणुकीत कॉंग्रेसला राम राम करत भाजपा प्रवेश केला आणि ते निवडूनही आले. मात्र आता त्यांची परिस्थिती ना घर का ना घाट का, अशी झाल्याने त्यांच्यामध्ये मोठी नाराजी आहे. त्यातच लोकसभेच्या बदल्यात पालघर विधानसभेची जागा भाजपाला सोडावी, अशी मागणीही आता होऊ लागली आहे. त्यामुळे नाराज राजेंद्र गवितांचं पुनर्वसन इथे होईल, अशी अपेक्षा भाजपा कार्यकर्त्यांकड़ून होत आहे.



मात्र दोन्हीकडे कायम नाराजी राहिल्यास शिवसेना आणि भाजपाचे कार्यकर्ते या निवडणुकीत एकमेकांना मनापासून साथ देतील का? हा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मधील काय तोडगा काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

आघाडीचा निर्णयही गुलदस्त्यातच!
तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि बविआ यांची युती झाल्याची चर्चा आहे, परंतु पालघर लोकसभेची उमेदवारी कुणाला? हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. त्यातच बहुजन विकास आघाडीकडून माजी खासदर बळीराम जाधव, माजी आमदार तथा राज्यमंत्री मनिषा निमकर तसंच ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन राजेश पाटीलही इच्छुक आहेत. त्यामुळे आघडीकडून उमेदवारी कोणाला मिळते हे देखील अजून निश्चित नाही. दुसरीकडे माकपा आपला स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याची शक्यता आहे.

त्यामुळे पालघर लोकसभेसाठी भाजप-शिवसेना युती, काँग्रेस-राष्ट्रवादी-बविआ आघाडी आणि माकपा असा सामना रंगणार असून निवडणुकीच्या आखाड्यात कोणते उमेदवार उतरवले जातात हे येणाऱ्या काळात पाहायला मिळेल.