पुणे : ईव्हीएमवरुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना अजित पवारांनीच घरचा आहेर दिला आहे. ईव्हीएमबाबत आपल्या मनात कुठलीही शंका नसल्याचं अजित पवार म्हणाले. इतकंच नाही, तर ईव्हीएममध्ये दोष असता तर भाजप पाच राज्यांमध्ये हरली नसती, असंही अजित पवार म्हणाले.


ईव्हीएम विषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही. ईव्हीएममध्ये दोष असता तर पाच राज्यात भाजप सरकार गेलं नसतं. पण काहींच्या मनात शंका आहे. आता यावर कोर्टाने निर्णय दिला आहे, असं म्हणत अजित पवारांनी काका शरद पवारांनाच अप्रत्यक्षरिता टोला लगावला.

Sharad Pawar Exclusive | मोदी सत्तेत आले, तरी सरकार 13 दिवसात पडेल, पवारांचं भाकित


दुसरीकडे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र ईव्हीएमवर विश्वास नसल्याचा पुनरुच्चार केला आहे. निवडणुकांमध्ये ईव्हीएम नकोच, अशी राष्ट्रवादीची भूमिका राहिली असल्याचं मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं.

घडाळ्यासमोरचं बटण दाबल्यावर कमळाला मत, शरद पवारांचा दावा | स्पेशल रिपोर्ट



काय म्हणाले होते पवार?

जर बारामतीची जागा भाजपने जिंकली तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या विस्फोटक मुलाखतीत केलं होतं. ज्यांनी कधी निवडणूक लढवली नाही, तेही बारामतीची जागा जिंकण्याचं धाडसाने सांगतात, त्यामुळे तंत्रज्ञानाच्या मदतीने ईव्हीएमशी छेडछाड करण्याचं काही नियोजन केलं आहे का, अशी शंका अनेकांच्या मनात असल्याचं पवारांनी बोलून दाखवलं होतं. त्यामुळे शरद पवारांना बारामतीचा गड गमावण्याची धास्ती वाटते का, अशा चर्चा रंगू लागल्या.

दरम्यान, राज्यातील लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातल्या नेत्यांची बैठक पार पडली. कार्यक्रमानंतर बोलताना अजित यांनी भाजप सरकार हे 'अटीचे सरकार' असल्याची टीका केली. आरक्षणाला अट, चारा छावणीला अट, प्रवेशाला अट, यातून कोणाचंही भलं होणार नाही, असं अजित पवार म्हणाले.
घड्याळाचं बटन दाबलं तर कमळाला मत गेल्याचं मी स्वतः डोळ्यानं पाहिलंय : शरद पवार

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग करुन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत होणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष फिल्डवर उतरावे लागेल. मात्र भाजपचे लोकप्रतिनिधी, मंत्री फिल्डवर जायला घाबरतात. कारण अधिकारी त्यांचं ऐकत नाहीत. आचारसंहितेचा बाऊ करतात, असं म्हणत अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
बारामतीची जागा भाजपने जिंकल्यास लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल : पवार

गेले काही दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ढग, ईमेल, डिजिटल कॅमेरा याबाबतची केलेली विधानं हास्यास्पद आहेत. ग्रामीण भागातील अडाणी लोकांना पण न पटणारी आहेत. यामुळे ते बरेच ट्रोल झाले आहेत, असं अजित पवार म्हणाले.