मुंबई  : काँग्रेस- राष्ट्रवादीचं सरकार असताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अटक ही मोठी चूक होती असा कबुलीनामा खुद्द राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिला आहे. एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेत बोलताना अजित पवारांनी हा खळबळजनक खुलासा केला आहे. राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या हट्टापायी बाळासाहेबांना अटक करण्यात आली होती, असंही अजित पवार म्हणाले. त्यामुळं बाळासाहेबांच्या अटकेसाठी राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्यानं हट्ट धरला होता असा सवाल आता उपस्थित झाला आहे.


शरद पवारांची ईडी चौकशी राजकीय सूडाच्या भावनेपोटी झाल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला होता. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात बाळासाहेबांना झालेल्या अटकेची आठवण करुन दिली होती. यासंदर्भात अजित पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी बाळासाहेबांची अटक चूक असल्याचे म्हटले.

अजित पवार म्हणाले की, त्या काळात माझं मत होतं की इतक्या टोकाचं राजकारण करू नये. मात्र त्यावेळी आमच्या मताला एवढी किंमत नव्हती. काही जणांच्या हट्टापायी त्यांना अटक करण्यात आली. वास्तविक कुणाच्याही बाबतीत असं करू नये, असे अजित पवार म्हणाले. आम्ही यावर आक्षेप घेतला असता 'आम्ही त्या विभागाचे प्रमुख आहोत, आम्हाला जे योग्य वाटतं ते आम्ही करणार आहोत', असं म्हटलं गेलं, असं अजित पवार यांनी सांगितलं.

दरम्यान यावेळी पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या विदर्भाविषयीच्या भूमिकेबाबत देखील मोठा गौप्यस्फोट केला. पवार यांनी सांगितलं की, फडणवीस म्हणाले होते की, माझ्या कारकिर्दीला साडेचार वर्ष झाल्यावर ठराव करून विदर्भ वेगळा करणार. तेलंगणासारखे विदर्भ देखील वेगळं राज्य आम्ही करणारच असं त्यांचं मत होतं. मात्र महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद जसं-जसं एक एक महिना पुढे जाऊ लागलं तसं त्यांनी विदर्भ मराठवाड्यासह अख्ख्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री राहणं पसंत केलं, असे पवार म्हणाले.



काँग्रेसमुळे राज ठाकरेंना महाआघाडीत घेऊ शकलो नाही : अजित पवार

राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाआघाडीत घेण्याची आमची खूप इच्छा होती, परंतु काँग्रेसमुळे घेता आले नाही. त्याबद्दल आम्हाला वाईट वाटतं, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केल्या. पवार म्हणाले की, राज ठाकरे यांच्या पक्षाला आघाडीत घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. काँग्रेस सोडून इतर मित्रपक्षांचा त्यास पाठींबा होता. परंतु काँग्रेसने मात्र त्यास विरोध केला. राज ठाकरे यांच्या पूर्वीच्या उत्तर भारतीयांबाबतच्या भूमिकांमुळे काँग्रेस राज यांच्यासोबत आघाडी करण्यास तयार नाही. काँग्रेसला असे वाटते की, जर महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्यासोबत त्यांनी आघाडी केली, तर त्याचा त्यांना उत्तर भारतात फटका बसेल. कदाचित काँग्रेसला राज ठाकरे यांचा महाराष्ट्रात फायदा होईलही, परंतु काँग्रेसचे पारंपरिक उत्तर भारतीय मतदार काँग्रेसवर नाराज होतील, अशी भीती काँग्रेसला वाटते, असे पवार म्हणाले.