गडचिरोली या नक्षलग्रस्त आणि राज्याच्या अगदी एका टोकाच्या जिल्ह्यातील अहेरी हा विधानसभा मतदारसंघ. नक्षलग्रस्त असल्यामुळे साहजिकच अतिसंवेदशील हे बिरूद या मतदारसंघातील जवळपास प्रत्येक मतदानकेंद्राला चिटकलेलं असतं.

फक्त तीन नेमक्या शब्दात या मतदारसंघाचं वर्णन करायचं तर नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील आणि आदिवासी.. हे तीन शब्द चपखल बसतात.

गडचिरोली जिल्हा २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला. त्यावेळी गडचिरोली, सिरोंचा हे चंद्रपूर जिल्ह्यामधील तालुके होते. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यात ईशान्य दिशेला असून आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांच्या सीमेलगत आहे. हा जिल्हा नक्षलग्रस्त आहे.

तर अशा या अतिसंवेदशील मतदारसंघात लढत मात्र तिरंगी होते. तरीही यावेळी भाजपला खूप भाव आहे. कारण या मतदारसंघातील अनेक प्रस्थापित नेत्यांना भाजपमध्ये जायचंय.

अहेरी विधानसभा मतदारसंघ एका अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला.  धर्मरावबाबा आत्राम हे अहेरीचे सर्वेसर्वा होते. मात्र मोदी लहरीत त्यांचा हा बालेकिल्ला भाजपने बळकावला. ज्या अहेरीत एकेकाळी भाजपचे बोटावर मोजण्याइतके कार्यकर्ते होते तिथे आता मोदी लाटेत अनेकांना भाजपप्रवेशाचे वेध लागलेत. फक्त वेधच नाही तर झुंबड उडालीय. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत युवा चेहरा, आदिवासी बांधवांचे राजे अंबरीषराव यांना भाजपने उमेदवारी दिली आणि ते प्रचंड बहुमताने निवडून आले. त्यामुळे पक्षात कार्यकर्त्यांची मेगा भरती सुरू झाली. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपचं वर्चस्व सहज जाणवणारं आहे.

अहेरी विधानसभा मतदारसंघात जिल्ह्यातल्या तब्बल पाच तालुक्यांचा सामावेश होतो. अहेरी, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा आणि मूलचेरा असे पाच तालुके या मतदारसंघात आहेत.

पाचही तालुके अतिसंवेदनशील, नक्षलग्रस्त भागात मोडतात. ह्या विधानसभा मतदारसंघातली निवडणूक कधीच सामान्य नसते. तर प्रशासन आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या लेखी महाराष्ट्रातील सर्वात आव्हानात्मक विधानसभा मतदारसंघ अहेरीचं नाव घेतात. नक्षलवादी निवडणुकीच्या दरम्यान अनेक घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न करतात.

अहेरी विधानसभा मतदारसंघात दोन लाख 35 हजार मतदार आहेत. त्यापैकी एक लाख 19 हजार पुरूष तर एक लाख 16 हजार महिला मतदार आहेत. एवढ्या मतदारांसाठी तब्बल तीनेकशे मतदान केंद्रे सज्ज असतात.

विधानसभा मतदारसंघातील प्रश्न

 ह्या विधानसभा क्षेत्रात अनेक समस्या अनुत्तरीत आहेत. अगदी स्वातंत्र्य काळापासून ह्या भागात दुर्गम क्षेत्रात जाण्यासाठी नीट रस्ते नाहीत. अनेक नद्यांना नाल्यांना पूल नाही.  शंभरपेक्षा जास्त गावात अजून वीज पोहचली नाही. अनेक योजना रखडल्या आहेत. दुर्गम भागात आरोग्याची समस्या पाचवीला पुजलेली. शिक्षणाच्याही योग्य सुविधा नाहीत. विविध विभागाचे शेकडो पदे रिक्त आहेत. ह्या भागात मोठ्या प्रमाणावर खनिज संपत्ती असूनही सुद्धा एकही मोठा कारखाना अजून उभारण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेक युवक बेरोजगार आहेत.



विद्यमान आमदारांनी काय केलं.




या क्षेत्रात विद्यमान आमदारानी तीन मोठे प्रोजेक्ट आणल्याचा दावा त्यांचे कार्यकर्ते करतात

१) महिला रुग्णालय : अहेरी येथे शंभर खाटांच्या महिला रुग्णालयाच्या उभारणीला सुरवात. ज्यामुळे 100 किमी गडचिरोली मुख्यालयी किंवा चंद्रपूर जिल्ह्यात जावं लागणार नाही. या हॉस्पिटलचं कामही वेगाने सुरू आहे.

२) एकलव्य शाळा  : हा शाळा प्रकल्प जिल्ह्यातला पहिला अत्याधुनिक शाळा प्रकल्प आहे. त्यामुळे भागातील आदिवासी मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळणं सुरू झालं.  हा प्रकल्प पूर्ण झाला असून आदिवासी मुले शिक्षणही घेत आहेत.


३) सुरजागड लोह प्रकल्प :  जिल्ह्याच्या इतिहासात पहिला मोठा औद्योगिक प्रकल्प सुरू होण्याच्या मार्गावर आहे. स्थानिक आदिवासी मुलांना  मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल ह्या आशेने सुरजागड  पहाडावरील कच्चा माल काढण्यात सुरुवात झाली. मात्र नक्षली रकारवायांमुळे सध्या काम बंद आहे. कोनसरी येथे कारखान्यासाठी जागा ही उपलब्ध करून घेतली असून मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन ही केलं. मात्र वर्षभरापासून पुढील कामासाठी मुहूर्त मिळालेला नाही.

या विधानसभा क्षेत्रात तीन प्रमुख  दावेदार असतात, यावेळीही निवडणूक तिरंगी लढत असणार आहे

१) राजे अंबरीषराव सत्यवानराव आत्राम - भाजपचे विद्यमान आमदार आणि माजी राज्यमंत्री
राजे अंबरीशराव सत्यवान आत्राम हे गोंड राजघराण्याचे सहावे वंशज आहेत. राजे सत्यवानराव आत्राम यांचे ते चिरंजीव. सत्यवानराव आत्राम यांनी नागविदर्भ आंदोलन समितीची स्थापना केली आणि  90 च्या दशकात अपक्ष म्हणून नागविदर्भ आंदोलन समितीच्या बॅनरखाली विधानसभा लढवली. सलग दोन वेळा आमदार राहिले. मात्र फार काळ राजकारणात राहू शकले नाही.
राजे सत्यवान यांचा दीर्घ आजारामुळे निधन झाल्याने त्यांचा राजकीय वारसा विद्यमान आमदार राजे अंबरीषराव आत्राम यांना मिळाली. 2014 मध्ये अंबरीष आत्राम हे विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आणि त्यांना भाजपतर्फे ऑफर देण्यात आली त्यांनी ती स्वीकारली आणि मोदी लहरीत ते प्रचंड मताने निवडून आले आणि महाराष्ट्र विधानसभेत युवा चेहरा उच्च शिक्षित असल्याने त्यांना भाजपने त्यांना राज्यमंत्रीपदही दिलं. त्यांच्याकडे आदिवासी विकास आणि वन या मंत्रालयाचा कारभार सोपवण्यात आला. त्यांना गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीही बनवण्यात आलं.

जिल्ह्यातील जनतेला त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र नव्यानेच राजकारणात आलेल्या अंबरिषरावांचा राजकीय अनुभव कमी पडला. कसं काम करायचं, कसे जनतेचे प्रश्न सोडवायचे, हे त्यांना कळत नव्हतं, मात्र त्यांनी धिम्या गतीने का होईना जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांची अखेर जोर लावला आणि  तीन मोठे प्रोजेक्ट आपल्या अहेरी विधानसभा क्षेत्रात आणले. त्यामुळे मतदारसंघातील जनतेला मोठा दिलासा मिळाला.

पहिल्यांदाच राज्यमंत्रीपद मिळालेल्या पालकमंत्र्याचा जिल्ह्यातला वेळ कमी झाला. अनेक महत्त्वाच्या बैठकीत गैरहजरी लागू लागली. संपर्कही कमी झाला. भेटायला आलेल्या लोकांना तासनतास थांबावं लागत असे. अनेक लोक कंटाळून घरी परतायचे, त्यामुळे त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित होऊ लागले. स्थानिक संघ परिवारातील लोकांनाही त्यांचा वेळ मिळायचा नाही. अशा अनेक तक्रारीमुळे मंत्रिमंडळ विस्तारात त्याचं मंत्रिपद काढून घेण्यात आलं. आता परत त्यांना भाजप तिकीट देईल का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे

२) धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम - राष्ट्रवादी काँग्रेस, माजी राज्यमंत्री

धर्मरावबाबा आत्राम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सेलिब्रिटी आहेत. बाबा आत्राम राष्ट्रवादी प्रदेश कार्यकारिणीत प्रदेश उपाध्यक्ष आहेत. ते  १९७१-७२ पासून राजकारणात सक्रिय आहेत. नागविदर्भ आंदोलन समितीचे खंदे कार्यकर्ते असलेले 1990 ते 1995 या काळात काँग्रेसचे आमदार होते. 1995 ते 1999 याकाळात ते गोंडवना गणतंत्र पक्षाचे आमदार होते. 2004 मध्ये ते राष्ट्रवादीत आले.
आघाडी सरकारमध्ये ते राज्यमंत्रीही होते.मात्र बारामती भागात काळवीट शिकार प्रकरणात त्यांना मंत्रीपद गमवावं लागलं. 2009 च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार दीपक आत्राम यांनी त्यांना पराभूत केलं. हा ऐतिहासिक विजय होता. चिंकारा प्रकरण त्यांना चांगलंच भोवलं.

३) दीपक आत्राम , माजी आमदार अपक्ष
दीपक आत्राम हे आदिवासी विद्यार्थी सेनेचे सर्वेसर्वा आहेत. दीपक आत्राम यांनी जिल्हापरिषद सदस्य म्हणून आपली राजकीय कारकीर्द सुरु केली. 2009 मधे अपक्ष उमेदवार म्हणून अहेरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढली आणि राष्ट्रवादीचे धर्मरावबाबा आत्राम यांना पराभूत करत पदार्पणातच निवडणूक जिंकली. मात्र पाच वर्षात विधानसभेतील अनेक प्रश्न सोडवण्यास ते असमर्थ ठरले. जनतेचा त्यांच्यावरील विश्वास उडाला. शून्यातून राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या दीपक आत्राम यांना पुढील म्हणजे 2014 च्या निवडणुकीत अहेरीच्या मतदारांनी घरी बसवलं.

अहेरीचा 2014 चा निकाल 
१) राजे अंबरीशराव आत्राम - भाजप         56,418
२)  धर्मरावबाब आत्राम - राष्ट्रवादी काँग्रेस   36,560
३) दीपक आत्राम - अपक्ष                     33,555

भाजपचे राजे अंबरीशराव 19,858 मताने विजयी 

मात्र ह्या विधानसभा क्षेत्रात तिहेरी लढत असली तरी भाजपची ताकद मोठी आहे. त्यामुळे अनेक उमेदवार भाजपच्या मेगाभरतीत जाण्यास इच्छुक आहेत. बाबा आत्राम हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जातंय. तर दीपक आत्राम ही मुबंईच्या चकरा मारत असल्याची चर्चा आहे. राजे अंबरीषराव यांचं मंत्रिपद काढल्याने ते नाराज आहेतच. भाजपची महाजनादेश यात्रा गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाली तेव्हा दोन प्रमुख शहरात जाहीर सभा झाल्या, मात्र राजेंनी त्याकडे पाठ फिरवली. आता त्यांना तिकीट मिळेल की नाही, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.