मुंबई : महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी उद्या,  21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र त्याचबरोबर निवडणुकीसाठी सट्टा बाजारही  पूर्णपणे सज्ज झाला असून महाराष्ट्र आणि हरियाणा मध्ये होणाऱ्या निवडणुकीवर जवळपास 30 हजार कोटींचा सट्टा लागला आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीवर 30 हजार कोटींचा सट्टा लागला असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र, हरियाणा निवडणुकीसाठी सट्टेबाजार सज्ज झाला आहे. सट्टाबाजाराच्या अंदाजानुसार भाजप आणि शिवसेनेला 288 पैकी एकूण 210-215 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीला जवळ पास 55 ते 60 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

कोणत्या पक्षाला किती भाव

भाजपला 120 जागांवर 1.60 पैसे भाव दिला आहे.

शिवसेनेला 85 जागांवर 3.00 रूपये भाव  दिला आहे.

काँग्रेसला  30 जागांवर 2.50 पैसे भाव  दिला आहे.

राष्ट्रवादीला 30 जागांवर 3.50 पैसे भाव  दिला आहे.

मोबाईल अॅप आणि हायटेक पद्धतीने राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी सट्टा सुरु आहे.   महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी महाभारत सुरू झालं आहे. शह आणि मात हा खेळ सुरू झाला आहे प्रत्येक पक्ष आपला मोहरा निश्चित करत आहे. मात्र त्याचबरोबर प्रत्येक निवडणुकीत सट्टेबाजार कोट्यवधीमध्ये चालतो. म्हणूनच यंदाही हा बाजार सजला आहे. मुंबईसोबतच देशभर आणि परदेशात बरेच ठिकाणी सट्टेबाज सक्रीय झाले आहेत.

यंत्रणा सज्ज

  • विधानसभा निवडणुकीसाठी 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र (बॅलेट युनिट) आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट (कंट्रोल युनिट) तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट  (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे.

  • विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे 6.50 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.