नवी मुंबई : पोलिसाच्या एक नाही तर दोन मुलांचा बळी जावूनही आरोपीला अटक करण्यात हलर्जीपणा दाखवून पोलिसांनीच आपल्यावर खरा अन्याय केला असल्याचा गंभीर आरोप मयत मुलांच्या वडीलांनी केलाय. त्यामुळे पोटच्या मुलांच्या मरणाच्या दुखापेक्षा आपल्याच पोलीस यंत्रणेनं दिलेल्या वेदना जास्त असल्याची भावना मयत मुलांच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.


शनिवारी रात्री दीड वाजता अक्षय गमरे आणि संकेत गमरे यांचा अपघात झाला आणि दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला होता. वाशीतील पाम बीच मार्गावर केस्टार हॉटेलजवळ हा भीषण अपघात झाला होता. भरधाव वेगात मर्सिडिज चालवत असलेल्या रोहन ॲबोट याने दोघांना उडवलं. या अपघातात दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला. आपली दोन मुलं रक्ताच्या थारोळ्यात पडूनही आरोपीने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल न करता पळून गेला. 200 फुटापर्यंत त्यांना फरफटत नेवून बळी घेणाऱ्या आरोपी रोहन ॲबोटला फाशी देण्याची मागणी मयत मुलांची आई मालती गमरे यांनी केली आहे. रोहन ॲबोट हा प्रसिध्द ॲबोट हॉटेलचे मालक यांचा मुलगा आहे.


मुंबई पोलिसांप्रमाणे नवी मुंबई पोलीसांकडे माणुसकी नसल्यानंच आपल्या दोन मुलांचा बळी घेणारा आरोपी मोकाट असल्याचा गंभीर आरोप अनिल गमरे यांनी केलाय. टिळक नगर पोलीस ठाण्यात अनिल गमरे हे रायटर म्हणून काम करतात. पोटच्या दोन मुलांचा अपघातात बळी गेल्यानं झालेल्या दुखापेक्षा आपल्याच पोलीस यंत्रणेने कसा अन्याय केलाय, याचे जास्त दुःख: गमरे यांना झालंय. आरोपी रोहन ॲबोट याने दारूच्या नशेत गाडी चालवली होती. अपघात झाला तेव्हा गाडीत दारूच्या बाटल्या होत्या. आरोपीला दोन दिवसानंतर अटक करतात.. याचाच अर्थ पोलिसांनी त्याच्या शरिरातील अल्कोहोल मेडिकल टेस्टमध्ये येणार नसल्याची काळजी घेतली असल्याचा गंभीर आरोप मयत अक्षय आणि संकेतच्या वडीलांनी केला आहे.


दरम्यान, पोलीस मात्र अनिल गमरे यांनी केलेल्या आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत. आरोपी रोहन ॲबोट याला दिवाणी, फौजदारी वाशी न्यायालयात हजर केले असता जामीन मंजूर झाला आहे.


महत्त्वाच्या बातम्या :