पालघर : चेन्नई विमानतळावरून अपहरण करून कारने पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील वेवजी गावच्या पश्चिम घाटातील जंगलात नेऊन एका नौदल अधिकाऱ्याला टाकून जिवंत जाळले. सुरजकुमार मिथिलेश दुबे (वय-27, रा. झारखंड, रांची) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. दरम्यान होरपळलेल्या दुबेची माहिती स्थानिकांनी दिल्यानंतर घोलवड पोलिसांनी त्याला आगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात हलविल्यांनंतर तेथे शनिवारी त्याचा मृत्यू झाला.


सुरजकुमार दुबे 31 जानेवारीला चेन्नई विमानतळावर पोहचला. तेथे तीन अज्ञातांनी त्याचे अपहरण केले. त्याला तीन दिवस चेन्नईला अज्ञात स्थळी कोंडून ठेऊन, त्याच्याकडे 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्याने नकार दिल्यानंतर कारमधून 5 फेब्रुवारीला महाराष्ट्र-गुजरात सीमेलगतच्या तलासरी तालुक्यातील वेवजी गावच्या पश्चिम घाटातील जंगलात सकाळी नऊच्या सुमारास आणण्यात आले. त्यानंतर रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तिघांनी त्याच्या शरीरावर पेट्रोल ओतून पेटवून दिले.


अवैध मद्य आणि लाखो रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त; पालघर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई


दरम्यान दुपारच्या सुमारास जंगलात विवस्त्र होरपळलेल्या अवस्थेतील व्यक्तीला पाहिल्यानंतर, स्थानिकांनी घोलवड पोलीस ठाण्याअंतर्गत वेवजी पोलीस चौकीला खबर दिली. पोलिसांनी तात्काळ दुबे याला डहाणूच्या आगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. चौकशी वेळी त्यांनी पोलिसांना जबाबात ही माहिती दिली. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्याला मुंबईत हलविण्यात आले, तिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तीन अज्ञात अपहरण कर्त्यांविरुद्ध घोलवड पोलीस ठाण्यात कलम 302, 364, 392 आणि 34 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास या ठाण्याचे प्रभारी अधिकारी कुंभार करीत आहेत.