सांगली : सांगली जिल्ह्यात प्रेमी युगुलाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अश्विनी गजानन माळी आणि लक्ष्मण संभाजी शिंदे अशी मृत प्रेमी युगुलाची नावं आहेत. एकमेकांना फोन करुन दोघांनीही आपापल्या घरी विष पिऊन आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे मृत अश्विनीचा विवाह सहा दिवसांपूर्वीच म्हणजे 1 जून रोजी झाला होता.


जत तालुक्यातील एकुंडी इथे ही घटना घडली. अश्विनी गजानन माळी (वय 22 वर्षे, रा. एकुंडी, ता. जत, सध्या रा. सलगरे, ता. मिरज) आणि लक्ष्मण संभाजी शिंदे (वय 21 वर्षे, रा. एकुंडी, ता. जत) या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. परंतु लक्ष्मण शिंदे आणि अश्विनी माळे यांचे प्रेमसंबंध कुटुंबियांना पसंत नव्हते. त्यातच अश्विनीच्या कुटुंबियांनी तिचा विवाह सलगरे इथल्या तरुणाशी करुन दिला. 1 जून रोजी तिचा विवाह झाला. लग्नानंतर ती रविवारी (5 जून) एकुंडी इथे माहेरी आली होती. त्यानंतर सोमवारी (6 जून) सकाळी अश्विनी आणि लक्ष्मण यांनी एकमेकांना फोन करुन आत्महत्या करण्याचं ठरवलं, असं समजतं. यानंतर दोघेही  आपापल्या घरी विषारी द्रव्य प्यायले असा अंदाज वर्तवला जात आहे. 


सकाळी साडेसातच्या दरम्यान अश्विनी आणि लक्ष्मणला अस्वस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शवविच्छेदनासाठी त्यांचे मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या दोन्ही घटनांची नोंद जत पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


इतर बातम्या