Gold Smuggling Case : मध्य प्रदेशातील रतलाममध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन तरुणांकडून एक-दोन हजार किंवा लाख नव्हे तर 13 किलो वजनाचे आणि आठ कोटी रुपयांचे सोने जपत् करण्यात आलं आहे. हे सोने बिस्किटांच्या स्वरुपात असून केंद्रीय तपास यंत्रणांना याची माहिती देण्यात आली आहे. आता एवढं सोनं कुठून आलं आणि कुठे नेण्यात येत होतं याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. पकडण्यात आलेल्या आरोपींकडून डॉलर, रियाध आणि दिरहाम ही तीन विदेशी चलनही जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची गुंतागुंत अधिकच वाढली आहे.  


आठ कोटी रुपयांचे हे सोने घेऊन दोन तरुण रेल्वेने रतलाम येथे येत असल्याची माहिती पोलिसांना एका खबऱ्याकडून मिळाली होती. 80 हून अधिक पेटीत सर्व सोने बिस्किटांच्या स्वरुपात भरण्यात आले होते. पोलिसांनी तपासणी केली असता ही माहिती खरी निघाली. तरुणांना थांबवून सामानाची झडती घेतली असता त्या पेट्यांमध्ये सोन्याच्या विटा आढळून आल्या. पोलिसांनी तरुणांची चौकशी केली असता त्यांना सोन्यासंबंधीत कागदपत्रे सादर करता आली नाही.


Gold Smuggling Case :  केंद्रीय तपास यंत्रणा सक्रिय


आठ कोटी रुपयांचे सोने आण विदेशी चलन जप्त झाल्यानंतर रतलाममध्ये खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी ही घटना घडली असून केंद्रीय तपास यंत्रणा, कस्टम विभागाचे अधिकारी आणि महसूल गुप्तचर संचालक तपासासाठी रतलामला पोहोचले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी आयकर आणि जीएसटीला आधीच माहिती दिली आहे.


सोने कुठून आले आणि कुठे जात होते?


मुंबईहून रतलामला येणाऱ्या ट्रेनमधून हे सोनं रतलामला आणण्यात येत होतं. याची माहिती मिळताच पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. यापैकी एक आरोपी हा राजस्थानचा आहे तर दुसरा आरोपी हा हरियाणाचा आहे. हे दोन्ही आरोपी सध्या रतलाममध्येच राहत असल्याची पोलिसानी माहिती दिली.


विशेष म्हणजे या सोन्यासोबत पोलिसांना एक जीपीएस ट्रॅकर आणि दिरहाम, रियाध आणि डॉलर सापडले आहेत. त्यामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी कोठून आणि कोठून होत होती, याचा शोध जीआरपी घेत आहे.


ही बातमी वाचा: