मुंबई: पालघरच्या (Palghar) एमबीबीएसला शिकणाऱ्या 22 वर्षीय सदिच्छा साने (Sadichcha Sane) बेपत्ताप्रकरणी आता मोठा खुलासा झाला आहे. आरोपी मिट्टू सिंहने सदिच्छा सानेची हत्या करुन तिचा मृतदेह समुद्रात फेकल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात तपास करत असलेल्या गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या जबाबात त्याने ही कबुली दिली आहे. पालघरच्या बोईसरमधील वैद्यकीय शिक्षण घेणारी 22 वर्षीय विद्यार्थिनी सदिच्छा साने ही 29 नोव्हेंबर 2021 पासून बेपत्ता आहे. याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर बँडस्टॅन्ड पोलीस स्टेशन बांद्रा इथे हे प्रकरण वर्ग करण्यात आलं होतं. 


बँडस्टँडवर शेवटचा सेल्फी काढला 


आरोपी मिट्टू सिंगने सदिच्छा सानेची हत्या करुन तिचा मृतदेह बँड स्टँडच्या समुद्रात फेकल्याची दिली कबुली दिली आहे. त्यामुळे तब्बल 14 महिन्यांनंतर या प्रकरणाचा छडा लागला आहे. मृत सदिच्छा साने आणि आरोपी मिट्टू सिंहने बँड स्टँडला शेवटचा सेल्फी काढला होता. मुंबई गुन्हे शाखा कक्ष 9 च्या पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली होती. मात्र मुलगी गेली कुठे हे अजून त्यांना तपासात निष्पन्न झालं नव्हतं. पोलिसांनी दोघांना अपहरणाच्या गुन्ह्यात अटक केले होते पण आता त्यात हत्येचे कलम जोडले जाणार आहे. आरोपीच्या कबुलनाम्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या का करण्यात आली याचा तपास पोलिस करत आहेत. पोलिसांनी हत्येसाठी कलम 302 आणि पुरावे नष्ट करण्यासाठी 201 कलम जोडले आहे.


मुंबई पोलिसांनी नौदलाच्या अधिकार्‍यांच्या मदतीने शुक्रवारी समुद्रात मुलीच्या मृतदेहाचा शोध घेण्यात येणार आहे. आरोपी सिंहने आपल्या जबाबात दावा केला आहे की, त्याने मुलीची हत्या केली आणि तिचा मृतदेह सुमारे 150 ते 200 मीटर अंतरावर बँडस्टँडजवळ समुद्रात फेकून दिला. मात्र त्याने तिची हत्या कशी केली आणि त्यामागचा हेतू काय होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.


29 नोव्हेंबर 2021 ला सदिच्छा झाली होती गायब 


दक्षिण मुंबई येथील जे. जे. ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमध्ये सदिच्छा साने ही तिसऱ्या वर्षात शिकत होती. 29 नोव्हेंबर 2021 रोजी ती परीक्षेसाठी जाते म्हणून घरातून निघाली. ती माघारी परतलीच नाही. सदिच्छाचा शोध कुठेच लागत नसल्यानं तिच्या कुटुंबियांनी बोईसर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. सदिच्छा बेपत्ता होऊन 15 दिवस उलटल्यानंतरही जेव्हा तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही.  तेव्हा कुटुंबीयांनी तिच्या अपहरणाचा संशय व्यक्त केला होता. सदिच्छाचा शोध घेण्यासाठी सोशल मीडियासह बँड स्टॅन्ड बस स्थानकासह वांद्रे परिसरात अनेक ठिकाणी तिचे फोटो लावण्यात आले होते. तर पालघर मध्येही या प्रकरणी अनेक मोर्चे निघाले होते.


जे. जे. मध्ये परीक्षेस जाते म्हणून ती घराबाहेर पडल्याने जे. जे. मार्ग पोलिसांनी देखील तिचा शोध घेतला. तिचा काहीच ठावठिकाणा लागत नसल्याने या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. तांत्रिक पुराव्यांवरुन तिचे शेवटचे लोकेशन वांद्रे बॅन्ड स्टॅन्ड येत होते. त्यामुळं तिच्या कुटुंबियांनी वांद्रे पोलिस ठाण्यातही धाव घेतली होती. गुन्हे शाखा युनिट 9 ने याबाबत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करतानाच पोलिसांनी 100 पेक्षा अधिक जणांची चौकशी देखील केली. सदिच्छाला शेवटचे जीवरक्षक मिथू सिंगने पाहिले होते.