Crime News: डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. सासू आणि नवऱ्याच्या जाचाला कंटाळून डोंबिवलीतील जागृती बारी हिनं आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण आडीवली ढोकळीमध्ये राहणारी जागृती बारी आपले पती आणि सासूसोबत राहत होती. 


तुझे काळे ओठ आहेत, तुझ्या तोंडाचा घाण वास येतो, पती आणि सासूच्या रोजच्या  टोमन्याने जागृतीने आपली जीवन यात्रा लग्नाच्या दोन महिन्यानंतर संपवली . 24 वर्षांच्या जागृतीने मोबाईलमध्ये नोट लिहून तिची सासू आणि नवऱ्याला जबाबदार धरलं आहे. डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत सदर प्रकरणी तपाय सुरु केला आहे.


नेमकं प्रकरण काय?


भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील गजानन भिका वराडे यांनी आपली मुलगी जागृतीचा विवाह जळगावमधील पिंप्राळामधील सागर रामलाल बारी सोबत दोन महिन्यांपूर्वी 20 एप्रिल 2024 रोजी लावून दिले. भुसावळच्या आदित्य मंगल कार्यालयात जागृती आणि सागरचं धुमधडाक्यात लग्न झालं. लग्नात मुलगा सागरला 14 ग्रॅमची सोन्याची चेन, 6 ग्रॅमची सोन्याची अंगठी देण्यात आली. सागर हा मुंबई पोलीस असल्याने विवाहानंतर  21 जूनला  कल्याण मधील आडीवली ढोकळी या परिसरामध्ये पतीसह राहायला जाणार असल्याने तिचे आई-वडील पिंप्राळा गावात भेटायला गेले. जागृतीचे आई-वडील भेटायला आले तेव्हा तिची सासू शोभा रामलाल बारी हिने हुंडा दिला नाही, अशी तक्रार केली हाती. तसंच मुंबईत घर घेण्यासाठी 10 लाख रुपये द्या, अशी मागणी केल्याचा आरोप वराडे कुटुंबाने केला आहे.


तुझ्या बहिणीने घरातील सिलिंग फॅनला गळफास घेतला...


सध्या शेतीमध्ये पैसा लागलेला आहे, त्यामुळे पैसे नाहीत. मी तुम्हाला थोडीफार रक्कम देईन, असं आम्ही सांगितलं. त्यानंतर मुलगी मुंबईमध्ये राहायला गेली, असं वराडे कुटुंबाने सांगितलं. यानंतर 5 जुलैला जागृतीचा पती सागरने तिचा भाऊ विशालला फोन केला. तुझ्या बहिणीने घरातील बेडरूममध्ये सिलिंग फॅनला गळफास घेतला असं जागृतीच्या पतीने सागरला सांगितलं आणि फोन कट केला. जागृतीच्या पतीचा फोन आल्यानंतर तिचे वडील, आई आणि काही नातेवाईक कल्याणमध्ये आले. यानंतर जागृतीच्या आईने पोलिसांकडे तक्रार केली. घर घेण्यासाठी 10 लाखांचा हुंडा मागणं, शारिरिक आणि मानसिक छळ करत असल्याचा गुन्हा पती सागर बारी आणि सासू शोभा बारी यांच्यावर दाखल करण्यात आला. .


जागृतीची आई काय म्हणाली?


दरम्यान जागृतीच्या आईने तिच्यासोबत शेवटचं काय बोलणं झालं हे सांगितलं आहे. ‘आई माझी सासू मला तू काळी आहेस तूझे ओठ काळे आहेत तोंडाचा घाण वास येतो असे हिणवुन तू माझ्या मुलाला पसंत नाही. घरातून निघून जा. नाहीतर आईकडून घर घेण्यसाठी 10 लाख रुपये घेऊन ये. माझा शारिरिक आणि मानसिक छळ करते, तू त्यांच्याशी बोलून घे’, असं जागृतीने आपल्या आईला फोनद्वारे सांगितले असल्याचे  जागृतीच्या आईने सांगितलं आहे. जागृतीचा पती मुंबई पोलिसांमध्ये कार्यरत  आहे. सागर आईसोबत कल्याण मधील आडीवली ढोकळी भागात एकविरा आई अपार्टमेंटमध्ये राहत आहे. डोंबिवलीमध्ये आल्यानंतर अवघ्या 13 दिवसांमध्येच जागृतीने 5 जुलैला टोकाचं पाऊल उचललं, त्याआधी तिने मोबाईलमध्ये नोट लिहिली.


पोलिसांनी जागृतीचा मोबाईल घेतला ताब्यात-


मोबाईल लॉक असल्यामुळे सागरला लॉक ओपन करता आलं नाही. यानंतर पोलिसांनी जागृतीचा मोबाईल ताब्यात घेतला. जागृतीच्या बहिणीने लॉक पॅटर्न सांगितल्यानंतर पोलिसांना नोट सापडली, ज्यात जागृतीने सासू आणि नवऱ्याला जबाबदार धरलं होतं. या आधारे मानपाडा पोलिसांनी जागृतीचा नवरा आणि सासूवर गुन्हा दाखल केला . सासू गहू घेण्यासाठी बाहेर गेली तेव्हा तिने बाहेरून घराला कुलूप लावलं, यानंतर जागृती 200 लिटर पाण्याच्या ड्रमची मदत घेऊन फॅनखाली उभी राहिली आणि ओढणीच्या साहाय्याने तिने गळफास लावून घेतला. माझ्या मुलीला टोकाचं पाऊल उचलायला प्रवृत्त करणाऱ्या तिच्या सासू आणि नवऱ्यावर कठोर कारवाई व्हावी, त्यांना शिक्षा मिळाली तर माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल, अशी मागणी जागृतीच्या आईने केली आहे.