Madhya Pradesh Crime : सहा वर्षांपूर्वी दिल्लीत (Delhi) घडलेलं बुराडी मृत्यू प्रकरण (Burari Deaths) आजही आठवलं तरी अंगावर शहारे येतात. आजही दिल्लीतील (Delhi News) हादरवणाऱ्या बुराडी प्रकरणाचा नुसता उल्लेख केला, तरीदेखील अंगावर शहारे येतात. पण याप्रकरणाशी जुळणारी घटना मध्यप्रदेशात घडली आहे. तोच दिवस, तीच पद्धत अगदी सगळं सारखंच. या जुळून आलेल्या योगायोगानं गावकऱ्यांना मात्र, धडकी भरली आहे. 


मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) अलीराजपूर (Alirajpur) येथे एकाच घरात पाच जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळल्यानं खळबळ उडाली आहे. पती, पत्नी आणि तीन मुलांचे मृतदेह असल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राजेश व्यास घटनास्थळी पोहोचले. ही हत्या की सामूहिक आत्महत्या? एफएसएल आणि शवविच्छेदन अहवालानंतरच हे स्पष्ट होईल, असं त्यांनी सांगितलं आहे. पोलीस आता एफएसएल टीमची वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे, या घटनेनं दिल्लीतील बुरारी येथे 1 जुलै 2018 रोजी घडलेल्या घटनेची आठवण करून दिली आहे. मध्य प्रदेशातील घटनेबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. 


अलीराजपूर जिल्ह्यातील सोंडवा पोलीस स्टेशन हद्दीतील रावडी गावात ही घटना घडली. मृतांमध्ये घराचा प्रमुख राकेश, त्याची पत्नी ललिता आणि मुलगी लक्ष्मी, दोन मुलं अक्षय आणि प्रकाश यांचा समावेश आहे. संपूर्ण कुटुंबाचा खून झाल्याची भीती नातेवाइकांनी व्यक्त केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाच्या तपासात व्यस्त आहेत.


फासावर लटकलेले 5 मृतदेह 


दिल्लीतील बुराडी मृत्यू प्रकरणानंतर अवघा देश हादरला होता. या सामुहित आत्महत्या प्रकरणानं प्रशासनालाही हादरवून सोडलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी अनेक अंगांनी तपास केला. आज 1 जुलै रोजी या घटनेला 6 वर्ष पूर्ण झाली आहेत. 30 जून 2018 रोजी रात्री उशिरा 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास चुंडावत कुटुंबातील (ज्यांना भाटिया कुटुंब असंही म्हणतात) 11 जणांनी आत्महत्या केली. पाईपला गळफास घेत, संपूर्ण कुटुंबानं आपलं जीवन संपवलं होतं. दिल्लीच नाहीतर संपूर्ण देश भेदरुन गेला होता. पुढे अनेक दिवस या प्रकरणाचा तपास सुरू होता. 


दिल्लीतील बुराडी आत्महत्या प्रकरणात घरातील दहा जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आले होते. तर कुटुंबातील सर्वात वयस्कर सदस्य असलेल्या वृद्ध महिलेचा मात्र गळा आवळून जीव घेतला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 जुलै 2018 रोजी त्यांच्या मृत्यूनंतर पहाटे घरातून त्यांचे मृतदेह सापडले. बुरारी प्रकरणात, असा दावा करण्यात आला होता की, कुटुंबप्रमुख ललित भाटिया यानं जादूटोण्याच्या प्रभावाखाली संपूर्ण कुटुंबाला सामूहिक आत्महत्या करण्यास भाग पाडलं होतं. 11 मृत्यू हे मनोविकारामुळे झाल्याचं मानलं गेलं होतं.  


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Mumbai Crime: झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!