Jalna Crime: गेल्या अनेक महिन्यांपासून वाळू माफीयांच्या वाढत्या दहशतीची मोठी चर्चा असताना, जालना जिल्ह्यातील गोदापट्ट्यात वाळू माफियांनी पुन्हा डोकं वर काढलं आहे.  घनसावंगी तालुक्यातील कुंभारी पिंपळगाव या गावात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वाळू टाकण्याच्या वादातून वाळूमाफियांनी अपहरण करून एका तरुणाची हत्या केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. सुरेश आर्दड (33) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.  रविवारी सकाळी या तरुणाचा बुलढाणा जिल्ह्यातील तढेगाव येथे मृतदेह आढळून आला. याप्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील किनगाव राजा पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. फरार आरोपींचा शोध पोलीस सध्या घेत आहेत. 

नेमके घडले काय?

याविषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार सुरेश आर्दड हा शनिवारी रात्री कुंभार पिंपळगाव येथील बाजार समितीच्या परिसरात थांबला होता. वाळू टाकण्यावरून झालेल्या जुन्या वादातून चार जण तिथे आले. तरुणास बेदम मारहाण करत गावठी कट्टा व कुऱ्हाडीचा धाक दाखवत त्याचे कारमध्ये कोंबून अपहरण केले. याप्रकरणी रात्री उशिरा मृत तरुण सुरेश आर्दड याचे चुलते सुभाष लळीतराव आर्दड यांच्या तक्रारीवरून संशयित हरी कल्याण तौर, सखाराम उर्फ खन्ना बप्पासाहेब अरदड व मिनाज बाबा मिया सय्यद तसेच एका कारचालका विरोधात घनसावंगी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गावठी पिस्तूल व कुऱ्हाड हातात घेत जीवे मारण्याची धमकी देत सुरेशला जबरदस्तीने गाडीत बसवून अज्ञात दिशेने नेले. 29 जून रोजी सकाळी बुलढाणा जिल्ह्यात किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका रस्त्यात या कडेला असणाऱ्या शेतात सुरेश अरदड चा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

जालन्याच्या गोदापट्ट्यात पुन्हा वाळू माफियांची दहशत

घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मृत व्यक्तीच्या डोक्याला मानेला आणि छातीवर तीव्र जखमा दिसून आल्या. प्राथमिक तपासात तरुणाचे नाव सुरेश तुकाराम अर्धड असल्याचे निष्पन्न झाले. खून करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह शेजारच्या जिल्ह्यात नेऊन फेकल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणातील संशयी आरोपींविरुद्ध अपहरण खून व गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. फरार आरोपींना शोधण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणामुळे जालना जिल्ह्यात प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. जालन्यातील गोदापट्ट्यात पुन्हा एकदा वाळू माफियांनी डोकं वर काढलं असून गुन्हेगारींच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. या घटनेनंतर जालना पोलीस सतर्क झाले आहेत.

हेही वाचा

धक्कादायक! पालकांच्या हलगर्जीमुळे दोन वर्षांचा मुलगा मेट्रोबाहेर, कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला