Bhiwandi Crime News : भिवंडी तालुक्यातील शेडगाव येथे कामावर निघालेल्या 40 वर्षीय व्यक्तीची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना 12 मे रोजी उघडकीस आली होती. या घटनेने संपूर्ण परिसर हादरुन गेला होता. गणेशपुरी पोलिसांसोबतच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकांनी अथक प्रयत्नातून या हत्येच्या गुन्ह्यातील चार आरोपींना गजाआड करण्यात यश मिळवले आहे. यामध्ये हत्येची सुपारी देणाऱ्या सख्ख्या भावाचा सुद्धा समावेश आहे.

Continues below advertisement

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 12 मे रोजी तालुक्यातील शेडगाव या गावातील परेश टोलाराम पाटील वय 40 वर्ष हा पाऊणे नऊ वाजताच्या सुमारास दुचाकी वरुन वसई येथे कामावर जात असताना वाशिंद-अंबाडी रोड शेडगाव फाटा या दरम्यान गावतलावा जवळ कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हत्याराने डोक्यावर वार करून गंभीर जखमी करून हत्या केली होती. याबाबत त्याचा भाऊ नरेश पाटील वय 37 याने गणेशपुरी पोलिस ठाण्यात हत्येच्या गुन्ह्याची फिर्याद दिली होती. या हत्येने परिसर हादरून गेला असताना गणेशपुरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कमलेश बच्छाव व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप गिते यांच्या नेतृत्वा खाली सात पोलीस उपनिरीक्षक यांची पथके तयार करून तपास सुरू केला. या पोलिस पथकाने अथक परीश्रम घेऊन 200 सीसीटीव्ही कॅमेरे पाहणी केली तसेच, तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून गुन्ह्यात आरोपींनी गुन्हा करण्या करीता वापरलेल्या वाहनाचा क्रमांक प्राप्त करून गुन्ह्यातील आरोपी राकेश भगवान पाटील, प्रेमजीत मधुकर घरत, दक्षत भानुकांत भोईर सर्व रा.आगरवाडी केळवा जि.पालघर यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडे गुन्ह्याच्या तपासात त्यांनी हत्येची कबुली दिली. 

जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाने भावाच्या हत्येची सुपारी दिली होती

गुन्ह्यात फिर्यादी असलेला मृत परेश याचा सख्खा भाऊ नरेश टोलाराम पाटील याने मारण्याची सुपारी देऊन भावास जीवे ठार मारण्याचा कट रचला असल्याचे कबुल केल्याने या गुन्ह्यात चार ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाने भावाच्या हत्येची सुपारी दिली होती. मयत परेश व आरोपी नरेश हे सख्खेभाऊ असून त्यांची सामायिक शेत जमीन मोठा भाऊ परेश याने आपल्या नावे करून घेतली होती, तसेच घर सुद्धा आपल्या नावे केले होते. या गोष्टीचा राग मनात धरून छोटा भाऊ नरेश याने दहा लाख रुपयांची आपल्या भावाच्या हत्येची सुपारी केळवा पालघर येथील गुंडांना दिली होती.

Continues below advertisement