मुंबई: अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची वांद्रे येथील खेरवाडी जंक्शनच्या परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या तीन मारेकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्याच्या काही दिवस आधीच मुंबई पोलिसांकडून बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांना सुरक्षा पुरवण्यात आली होती. त्यानुसार बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेसाठी तीन पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मात्र, तरीही हल्लेखोरांनी डाव साधत बाबा सिद्दीकी यांची हत्या केली. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार होत असताना त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस (Mumbai Police)सुरक्षारक्षक कुठे होते, हा प्रश्न उपस्थित झाला होता. याबद्दल आता नवीन माहिती समोर आहे. 


मुंबई पोलिसांकडून नुकताच बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवण्यात आला. बाब सिद्दीकी यांना 2+1 अशाप्रकारची सुरक्षा पुरवण्यात आली होती. त्यानुसार दिवसा बाबा सिद्दीकी यांच्यासोबत 2 आणि रात्री एक सुरक्षारक्षक तैनात असायचा. बाबा सिद्दीकी हे खेरवाडी जंक्शनजवळ झिशान यांच्या कार्यालयात असताना त्यांच्यासोबत दोन पोलीस सुरक्षारक्षक होते. यापैकी एक पोलीस सुरक्षारक्षक रात्री साडेआठ वाजता  ड्युटी संपल्याने निघून गेला.


बाबा सिद्दीकी झिशान यांच्या कार्यालयातून बाहेर  पडले तेव्हा त्यांच्यावर मारेकऱ्यांनी गोळ्या झाडल्या. यावेळी बाबा सिद्दीकी यांच्यासोबत केवळ एकच पोलीस कर्मचारी होता. मारेकऱ्यांपैकी शिवकुमार याने बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या. तर दुसरा हल्लेखोर धर्मराज कश्यप याने त्याचवेळी मिरचीचा स्प्रे हवेत फवारला. हा स्प्रे आपल्या डोळ्यात गेल्याने आपण उलटा गोळीबार करुन प्रत्युत्तर देऊ शकलो नाही, असा जबाब संबंधित पोलीस सुरक्षारक्षकाने दिला. 


झिशान सिद्दीकींचा सवाल


झिशान सिद्गीकी यांनी गेल्या दोन दिवसांत पोलिसांची भेट घेतली होती. या घटनेचे राजकारण करु नका. आम्हाला न्याय हवा, असे झिशान सिद्दीकी यांनी म्हटले होते. आपल्या वडिलांवर गोळीबार होत असताना पोलीस सुरक्षारक्षक काय करत होता, त्याला काहीच कसे करता आले नाही, असा सवाल झिशान यांनीही उपस्थित केला. त्यामुळे आता मुंबई पोलिसांकडून बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या तीन कर्मचाऱ्यांचा सविस्तर जबाब नोंदवला जाणार आहे


मुंबई पोलिसांकडून वेगाने तपास 


बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी तीन ते चार संशयित मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या सगळ्यांची चौकशी सुरु आहे. मुंबईच्या आसपासच्या परिसरातून या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. याशिवाय, मुंबई पोलीस दलाची वेगवेगळी पथके अन्य राज्यांमध्ये जाऊन संशयितांची तपासणी करत आहे. सध्या आठपेक्षा जास्त लोकांची चौकशी सुरु आहे. ज्या राज्यात बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणाशी काही संशयास्पद गोष्टी आढळत आहेत, तिकडे स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुंबई गुन्हे शाखेचा तपास सुरु आहे.


आणखी वाचा


बाबा सिद्दीकी यांची हत्या का झाली?; झिशानच्या ट्विटनंतर वेगवान हालचाली, पोलिसांकडून नवीन अँगलने तपास सुरु