अमरावती :  मागील महिन्यात अमरावती शहरात तीन तलवारी जप्त करण्यात आल्या होत्या आता पुन्हा तब्बल 29 तलवारी जप्त केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. अमरावती शहरात मागील काही दिवसांपासून घडत असलेल्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर या कारवाईचे महत्व वाढले आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅमेझॉन कंपनीचा अनडीलीव्हर्ड स्टॉक तसेच शिल्लक माल हा लिलाव करून इतर कंपन्यांना विकला जातो. पंजाबच्या भटिंडा येथील ब्रँड कॅन्सल या कंपनीने असाच माल खरेदी करून मध्य प्रदेशातील आरआरसी नामक कंपनीला विकला.  त्यानंतर या आरआरसी कंपनीकडून अमरावतीच्या लक्ष्मी गणेश कम्युनिकेशन नामक कंपनीने काही माल मागविला ज्यात तब्बल 29 तलवारी निघाल्या. याची माहिती कंपनीच्या सुपर वायझरने राजापेठ पोलिसांना दिली. मागणी केली नसताना ही तलवारी आढळून आल्याने ही तक्रार करण्यात आली. राजापेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि पंचनामा करून हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या 29 तलवारीची एकूण किंमत अंदाजे 1 लाख 45 हजार रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


या प्रकरणात राजापेठ पोलिसांनी ब्रँड कॅन्सल (भटिंडा, पंजाब), आरसीसी ग्रुप (बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) आणि लक्ष्मी गणेश कम्युनिकेशन (अमरावती) संचालकांवर कलम 4/25 आर्म ऍक्ट आणि G 26,29 आर्म ऍक्ट 1959 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात अमरावती शहरात तीन हत्येच्या घटना घडल्या नंतर आता इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडल्याने भीती व्यक्त केली जात आहे. 


संबंधित बातम्या :